खेळ कोणताही असो, त्या खेळाच्या खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती म्हणजेच स्पोर्ट्समनशिप स्पिरिट नसेल, तर तो खेळ प्रेक्षकांना रुचत नाही. जगात सर्वाधिक खेळला जाणारा फुटबॉल हा आक्रमक खेळ असला तरीही, प्रत्येक फुटबॉलर तो जितका सभ्यतेने खेळता येईल तितक्या सभ्यपणे खेळताना दिसून येतो. क्रिकेटला तर ‘जंटलमन्स गेम’ असे म्हटले जाते. जगभरातील काही मोजकेच देश क्रिकेट खेळतात. असे असले तरीही त्या देशांमध्ये क्रिकेटची अफाट लोकप्रियता आहे. क्रिकेट हा खेळ लोकांच्या काळजाजवळ जाण्यामागे खेळाडूंची खिलाडूवृत्तीही तितकीच महत्त्वपूर्ण ठरली. आज अशाच, क्रिकेटच्या मैदानावर घडलेल्या एका असामान्य घटनेविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या घटनेत खिलाडीवृत्ती दाखवणारा खेळाडू, दुसरा तिसरा कोणीही नसून भारताचे वर्ल्डकप विनिंग कॅप्टन कपिल देव हे आहेत. आजच्या लेखामध्ये आपण त्यांनी दाखवलेल्या विलक्षण खिलाडूवृत्तीबद्दल जाणून घेऊ.
सन 1987 साली प्रथमच इंग्लंडबाहेर वर्ल्डकप आयोजित केला जात होता. भारत आणि पाकिस्तान यावेळी स्पर्धेचे यजमानपद भूषवत होते. भारतीय उपखंडात मागील काही दशकात क्रिकेटला कमालीची लोकप्रियता लाभलेली. याचा फायदा उचलण्यासाठी जगमोहन दालमिया आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा वर्ल्डकप आयोजित करण्याचे शिवधनुष्य पेललेले. भारत स्पर्धेत डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून सहभागी होत होता.
वर्ल्डकपची तिसरीच मॅच होती यजमान भारत व आणि फेवरेट्स ऑस्ट्रेलिया यांच्यात. ग्राऊंड होते चेन्नईचे ऐतिहासिक चेपॉक स्टेडियम. 9 ऑक्टोबरच्या सकाळी उडवलेला टॉस कपिल देव यांच्या बाजूने पडला आणि त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही ओपनर डेविड बून आणि ज्योफ मार्श यांनी झोकात सुरुवात केली. 110 रन्सची ओपनिंग पार्टनरशिप.
बून 49 रन्स करून परतल्यानंतर वन डाऊनला डीन जोन्स यांचे आगमन झाले. जोन्स यांनी वर्षभरापूर्वीच याच चेन्नईच्या मैदानावर टेस्टमध्ये ऐतिहासिक डबल सेंचुरी मारलेली. एखाद्या पेंटरने चित्रात रंग भरावे अशी सुंदर बॅटिंग जोन्स करू लागले. स्पिनर्सला तर त्यांनी सेट व्हायचा चान्स दिला नाही. इकडे मार्श यांनी पहिले वर्ल्डकप शतक ठोकले.
जोन्सही फॉर्ममध्ये आलेले. त्यांनी मनिंदर सिंग यांच्या ओवरमधील बॉल लाँग ऑनला हवेतून मारला. हा कॅच होईल असे वाटू लागले. त्यावेळी टीम इंडियातील सर्वात उंच खेळाडू रवी शास्त्री यांना तो उंचावरून आलेला बॉल कॅच करण्यात अपयश आले आणि बॉल खाली पडला. ही सारे अगदी बाऊंड्री लाईनच्या जवळ घडले. तो सिक्स आहे की, फोर हे अंपायर डिकी बर्ड यांना ठरवता येत नव्हते. त्यांनी शास्त्री यांना फोर की सिक्स, असे विचारले असता, त्यांनी फोरचा इशारा केला. बर्ड यांनीदेखील फोरचा निर्णय दिला. इकडे बॅटर डीन जोन्स यांचे म्हणणे होते की, हा सिक्स आहे. नेहमी स्लेजिंसाठी तयार असणारे इंडियन विकेटकीपर किरण मोरे यांनी ही संधी साधली. जोन्स यांना स्लेज करत ते म्हणाले, “हा फोर आहे. तुला कुठून सिक्स वाटला रे?”
जोन्स यांनी अंपायर बर्ड यांना पुन्हा एकदा हा फोर नसून सिक्स आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बर्ड यांनी, इनिंग संपल्यानंतर याविषयी चर्चा करू असे उत्तर दिले. ऑस्ट्रेलियाने आपल्या 50 ओव्हरमध्ये 268 रन्स स्कोअर बोर्डवर लावल्या.
पहिली इनिंग संपल्यानंतर ब्रेकदरम्यान ऑस्ट्रेलियन मॅनेजर अॅलन क्रॉम्प्टन यांनी आपण ‘त्या’ फोरच्या निर्णयाशी सहमत नसल्याचे सांगितले. क्रॉम्प्टन, अंपायर्स बर्ड आणि डेविड आर्चर यांच्यात काही वेळ चर्चा झाली आणि त्यानंतर हे तिघेही इंडियन कॅप्टन कपिल देव यांच्याकडे गेले. कपिल देव यांनी खिलाडूवृत्तीचे अत्युच्च प्रमाण दाखवत, त्या फोरला सिक्स म्हणण्यास अनुमती दिली.
ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 268 वरून 270 झाला आणि टीम इंडियाला जिंकण्यासाठी 271 रन्सचे नवीन आव्हान मिळाले. इंडियन ओपनर सुनील गावसकर आणि कृष्णम्माचारी श्रीकांत या अनुभवी ओपनर्सनी 69 रन्सची सलामी दिली. गावसकर आऊट झाल्यानंतर, युवा नवज्योतसिंह सिद्धू यांनी पहिल्या बॉलपासून आक्रमण करण्याचे धोरण स्वीकारले. श्रीकांत आणि सिद्धू या दोघांनीही आपापली फिफ्टी पूर्ण केली. सिद्धू 73 रन्सवर आऊट झाले तेव्हा, टीम इंडियाचा स्कोर होता 3 विकेट 207. मॅच यजमानांच्या बाजूने झुकलेली, पण अझरुद्दीन, शास्त्री, कपिल देव हे सर्व भरवशाचे बॅटर नियमित अंतराने तंबूत परतले. अचानक मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचे पारडे जड झाले.
एकोणपन्नासव्या ओव्हरमध्ये, ऍलन बॉर्डर यांच्या डायरेक्ट थ्रोवर ऑलराऊंडर मनोज प्रभाकर आऊट झाला आणि मॅचमधील रंगत अजून वाढली. शेवटच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला विजयासाठी सहा रन्सची आवश्यकता होती. किरण मोरे व मनिंदर सिंग ही अखेरची जोडी मैदानात उरलेली. स्ट्राईकला असलेल्या मनिंदर यांनी स्टीव वॉच्या पहिल्या आणि चौथ्या बॉलवर प्रत्येकी दोन रन्स काढत टीम इंडियाला विजयाच्या समीप आणले. यजमानांना विजयासाठी दोन बॉलमध्ये दोन रन्सची गरज होती. वॉने टाकलेला पाचवा बॉल जोरात मारायच्या नादात हुकला आणि त्या बॉलने स्टम्प्सचा वेध घेतला. टीम इंडियाची इनिंग 269 रन्सवर संपली आणि ऑस्ट्रेलियाने अवघ्या एका रनने विजय मिळवला.
कपिल देव यांनी खिलाडूवृत्तीने ऑस्ट्रेलियाला बहाल केलेल्या ‘त्या’ दोन रन्स विजय आणि पराभवातील अंतर ठरल्या. ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकली, पण जगभरातील क्रिकेटप्रेमींची मने मात्र कपिल देव यांनीच जिंकली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हे’ 4 दिग्गज जगात चमकले, पण क्रिकेटच्या पंढरीत ठरले अपयशी; यादीत दोन भारतीयांचा समावेश
जेव्हा गोलंदाजीचा बादशाह बॅटिंगमधील ‘किंग’ला नडलेला; मॉडर्न क्रिकेटमधील ‘हा’ किस्सा वाचाच