भारताचा क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिले २ सामने पूर्ण झाले आहेत. या दोन सामन्यांनंतर मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे केपटाऊन येथे होणारा तिसरा कसोटी (Cape Town Test) सामना निर्णायक असणार आहे. अशातच भारतासाठी आनंदाची बातमी म्हणजे या सामन्यासाठी कर्णधार विराट कोहली याचे (Virat Kohli) पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे.
जोहान्सबर्ग येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत विराट दुसऱ्या कसोटीला पाठीच्या दुखापतीमुळे मुकला होता. पण, आता तो या दुखापतीतून सावरला असल्याचे दिसून आले आहे. तसेच तो अनेकदा नेटमध्ये सरावही करताना दिसला आहे. त्यामुळे विराट ११ ते १५ जानेवारीदरम्यान होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता आहे. पण जर असे झाले, तर अंतिम ११ जणांच्या संघातून बाहेर कोणाला करायचे हा यक्ष प्रश्न भारतीय संघव्यवस्थापनासमोर आहे. दरम्यान, यासाठी ४ असे खेळाडू आहेत, ज्यांच्याऐवजी विराटला ११ जणांच्या संघात संधी दिली जाऊ शकते. कोण आहेत, ते खेळाडू त्यावर एक नजर टाकू.
१. अजिंक्य रहाणे
भारताच्या कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) गेल्या वर्षभरापासून फॉर्मशी झगडताना दिसत आहे. असे असले तरी, त्याने जोहान्सबर्ग कसोटीत अर्धशतकी खेळी केली होती. पण, तरीही त्याचा एकूणच फॉर्म लक्षात घेता त्याला अंतिम ११ जणांच्या संघातून बाहेर केले जाऊ शकते. परंतु, आता रहाणेचा अनुभव पाहाता, त्यावर आणखी विश्वास ठेवला जाणार का की विराटसाठी त्याला बाहेर केले जाणार हे पाहावे लागणार आहे.
२. चेतेश्वर पुजारा
कसोटीपटू म्हणून नावलौकीक मिळवलेला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Puajara) देखील रहाणेप्रमाणेच गेल्या काही महिन्यांपासून झगडताना दिसून येत आहे. पण त्यानेही जोहान्सबर्ग कसोटीत आक्रमक अर्धशतक करत आपली जागा पक्की करण्याचा प्रयत्न केला होता. पण असे असले तरी त्याच्याही बॅटमधून गेल्या काही महिन्यांपासून मोठी खेळी साकारण्यात आलेली नाही, त्यामुळे त्यालाही अंतिम ११ मधून बाहेर केले जाऊ शकते.
अधिक वाचा – ‘त्या’ विजयी फॉर्म्युल्यासह विराट करणार केपटाऊन कसोटीत पुनरागमन; ‘टीम इंडिया’ रचू शकते इतिहास
३. हनुमा विहारी
भारतीय संघव्यवस्थापनाने जर अनुभवाला अधिक पसंती दिली, तर रहाणे आणि पुजारा अंतिम ११ जणांच्या संघात कायम राहू शकतात आणि हनुमा विहारीला (Hanuma Vihari) विराटसाठी आपली जागा सोडावी लागू शकते. मात्र, विहारीने जोहान्सबर्ग कसोटीत नाबाद ४० धावांची चांगली झुंज दिली होती. तसेच त्याने तळातल्या फलंदाजांबरोबर छोट्याछोट्या भागीदारी उभारण्याचाही प्रयत्न केला होता. तसेच यापूर्वी त्याने भारत अ संघाकडून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दमदार कामगिरी केली होती, अशा परिस्थितीत आता संघव्यवस्थापन काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल.
व्हिडिओ पाहा – टोकियो ऑलिम्पिक… भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा
४. मोहम्मद सिराज
दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) दुसऱ्या कसोटीदरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या तिसऱ्या कसोटीतील उपस्थितीवर सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे जर सिराज तिसऱ्या कसोटीतून बाहेर झाला, तर एका खेळाडूची जागा खाली होईल. अशावेळी विराट संघात येऊ शकतो, पण मग भारताला एका वेगवान गोलंदाजाशिवाय खेळावे लागेल. त्यामुळे हा पर्याय भारतीय संघ निवडण्याची शक्यता खूप कमी आहे. जरी सिराज बाहेर झाला, तरी दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यांचा विचार करता त्याच्याऐवजी दुसऱ्या वेगवान गोलंदाजाला खेळवण्याचा विचार प्रामुख्याने होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
‘क्रमांक ७ अजूनही मन जिंकतोय’, धोनीकडून ‘हे’ गिफ्ट मिळताच पाकिस्तानी गोलंदाजाचे इमोशनल ट्वीट
क्रिकेटच्या मैदानात पुन्हा दिसणार कैफची चित्त्यासारखी चपळाई! ‘या’ स्पर्धेतील सहभाग झाला निश्चित
कोरोनाची तिसरी लाट आली तरी मायदेशातील ‘ती’ मालिका होणारच! बीसीसीआयने घेतली परखड भूमिका