दिग्गज फलंदाज एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने 13 व्या हंगामाची सुरुवात केली. शनिवारी झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सीएसकेने गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा पाच गडी राखून पराभव केला. मात्र, जिंकूनही धोनी समाधानी दिसला नाही. सामन्यानंतर तो म्हणाला की त्याच्या संघाला अजूनही काही विभागात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई इंडियन्सविरुध्द पहिल्या सामन्यात सीएसकेने पाच गाड्यांनी विजय मिळविला. सामन्यानंतर धोनी म्हणाला, “संघात बरीच सकारात्मकता आहे पण काही विभागांवर काम करण्याची गरज आहे. विशेषतः खेळपट्टीवर टिकून खेळण्याबाबत. दव पडायच्या आधी खेळपट्टीवर चेंडूची थोडी हालचाल होते. अशा परिस्थितीत, जर आपल्याकडे फलंदाज शिल्लक असतील तर आपण फायद्यात राहू शकतो.”
पहिल्या सामन्यातील अनुभवी फलंदाज रायडू आणि दक्षिण आफ्रिका संघाचा स्टार फलंदाज फाफ डुप्लेसिस यांच्यातील भागीदारी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत धोनी म्हणाला, “आमच्या गोलंदाजांना लय मिळण्यास वेळ लागला. रायडूने फाफबरोबर उत्कृष्ट भागीदारी केली. आमचे बहुतेक खेळाडू निवृत्त झाले आहेत, त्यामुळे चांगली गोष्ट म्हणजे त्यातील कोणताही खेळाडू जखमी झालेला नाही.”
एमएस धोनीने मागच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, गेल्या वर्षीच्या वनडे विश्वचषकानंतरचा हा त्याचा पहिलाच स्पर्धात्मक सामना होता. तो म्हणाला “मैदानात उतरणे ही वेगळीच भावना आहे. तुम्ही खूप सराव केला आहे पण मैदानावर खेळणे त्यापेक्षा वेगळे आहे. तेथे तुम्हाला परिस्थितीचे आकलन करावे लागेल आणि सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.”
विशेष म्हणजे सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर मुंबई संघाने नऊ गडी बाद 162 धावा केल्या होत्या. चेन्नई संघाकडून अंबाती रायडूने 71 आणि फाफ डुप्लेसिसने नाबाद 58 धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या मदतीने चेन्नई संघाने 19.2 षटकांत 166 धावा करत सामना जिंकला.