भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा खेळ अत्यंत निराशाजनक ठरला आणि ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून विजय मिळवला. या पराभवानंतर टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पिछाडीवर गेली, कारण पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 18.4 षटकांत 125 धावांवर सर्वबाद झाले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने फक्त 13.2 षटकांत 6 गडी गमावून 126 धावा करत लक्ष्य सहज गाठले. या सामन्यात अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) वगळता इतर कोणताही भारतीय फलंदाज विशेष चमक दाखवू शकला नाही.
या पराभवानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसत होता. ते कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत (Suryakumar Yadav) चर्चा करताना पाहायला मिळाले. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी आणि रागाचे भाव ठळकपणे जाणवत होते. गंभीर काही मुद्द्यांवर सूर्यासोबत गंभीर चर्चेत गुंतलेले दिसत होते, ज्यावरून स्पष्ट होतं की प्रशिक्षक म्हणून ते संघाकडून अधिक जबाबदार आणि शिस्तबद्ध खेळाची अपेक्षा करत आहेत. मैदानावरचा तो संवाद पाहून चाहत्यांमध्येही चर्चा रंगली आहे की अखेर गंभीर नेमके कशावर नाराज होते.






