शुक्रवारी (2 ऑगस्ट) भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला, जो बरोबरीत सुटला. या सामन्याद्वारे विराट कोहली आणि रोहित शर्मा टी20 विश्वचषक संपल्याच्या एका महिन्यानंतर भारतीय संघात परतले. याशिवाय श्रेयस अय्यर आणि केएल राहुलचंही भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिली एकदिवसीय मालिका आहे.
या सामन्यातील एका गोष्टीनं भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. या सामन्यात भारतीय संघानं जी जर्सी घातली होती, त्या जर्सीवर तीन स्टार होते. भारतीय क्रिकेट संघाची ही नवीन जर्सी पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत, कारण काही दिवसांपूर्वी झालेल्या टी20 मालिकेतील भारतीय संघाच्या जर्सीवर दोनच स्टार्स होते. तसंच भारतानं आतापर्यंत दोनच एकदिवसीय विश्वचषक जिंकले आहेत. मग जर्सीवर तीन स्टार्स कसे?
वास्तविक, हे तीन स्टार भारताच्या तीन मोठ्या स्पर्धा जिंकण्याचं प्रतीक आहेत. सर्वप्रथम 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. यानंतर 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. याशिवाय धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली होती. भारतानं या तीन मोठ्या स्पर्धा जिंकल्या असल्यानं भारतीय संघाच्या जर्सीवर 3 स्टार्स आहेत. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळ किंवा जर्सी निर्मात्यांकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांकानं 75 चेंडूत 56 धावा केल्या तर ड्युनिट वेलालागेनं 65 चेंडूत नाबाद 67 धावा केल्या. श्रीलंकेनं 50 षटकात 8 गडी गमावून 230 धावा केल्या आणि भारताला 231 धावांचे लक्ष्य दिलं.
प्रत्युत्तरात, भारतीय संघाचे फलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाही. फक्त कर्णधार रोहित शर्मानं 47 चेंडूत 58 धावा केल्या. याशिवाय केएल राहुल आणि अक्षर पटेल यांनाच 30 धावांचा टप्पा पार करता आला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय संघाला 47.5 षटकांत 230 धावांत गुंडाळून सामना बरोबरीत सोडवला.
हेही वाचा –
भारत विरुद्ध श्रीलंका सामना टाय, मग सामनावीराचा पुरस्कार कोणाला मिळाला?
जिंकता-जिंकता गंडली टीम इंडिया, असलंकानं 2 चेंडूत केला गेम; भारत-श्रीलंका सामन्याचा अनपेक्षित निकाल
‘मी म्हातारा झालोय… कोणीही मला परवडणार नाही..,’ वीरेंद्र सेहवाग असं का म्हणाला?