भारत आणि पाकिस्तानमधील (IND vs PAK) तणावाचा थेट फटका टी-20 वर्ल्ड कप 2026 ला बसला आहे. पाकिस्तान सरकारने 15 फेब्रुवारीला भारतासोबत सामना न खेळण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे भविष्यात भारत आणि पाकिस्तानचे सामने कधीच होणार नाहीत का? असा प्रश्न निर्माण झाला असून, यावर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू बासित अली (Basit Ali) यांनी महत्त्वाची विधाने केली आहेत.
बासित अली यांच्या मते, या वादानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) नवे नियम बनवेल. सध्याच्या नियमानुसार, जर एखाद्या देशाच्या सरकारने खेळण्यास मनाई केली, तर तो संघ सामना नाकारू शकतो. त्यांनी म्हटले की, जसा भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तानला येण्यास नकार दिला होता, तसाच निर्णय आता पाकिस्तानने घेतला आहे. 2021 पर्यंत भारत-पाकिस्तान सामन्यांसाठी अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. आता सामने झाले नाहीत, तर प्रसारकांचे प्रचंड नुकसान होईल.
बासित अली यांनी संकेत दिले आहेत की, आता क्रिकेट चाहत्यांना भारत-पाक सामना पाहणे कदाचित स्वप्नच ठरेल. 2012 पासून दोन्ही देशांत कोणतीही स्वतंत्र मालिका झालेली नाही. केवळ पुरुषांचेच नाही, तर महिला क्रिकेटमध्येही आता भारत-पाकिस्तान संघ एकमेकांसमोर येणार नाहीत, अशी शक्यता बासित अली यांनी वर्तवली आहे. बासित अली यांच्या मते, भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटचे नाते आता पूर्णपणे तुटण्याच्या मार्गावर आहे.






