आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारतीय महिला संघाचा प्रवास संपुष्टात आला. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारताला 5 धावांनी पराभूत करत स्पर्धेतून बाहेर काढले. केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताला विजयासाठी 173 धावांचे आव्हान मिलाले होते. यावेळी 8 विकेट्स गमावत भारताला फक्त 167 धावाच करता आल्या. त्यामुळे विजय मिळवत ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पोहोचला. मात्र, भारताचा पराभव अनेकांच्या पचनी पडला नाहीये. आजी-माजी खेळाडूंनी हरमनप्रीत कौर हिच्यासह संघावर टीकास्त्र डागले. मात्र, भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने मात्र हरमनप्रीतला पाठिंबा दिला आहे.
आयसीसी महिला टी20 विश्वचषक (ICC Womens T20 World Cup 2023) स्पर्धेत हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) धावबाद झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. डावाच्या 15व्या षटकात दुसऱ्या धावेसाठी परतताना हरमनप्रीतची बॅट मैदानावर गुंतली होती. त्यामुळे तिला एलिसा हिली हिने बेल्स उडवत धावबाद केले होते. यानंतर भारताची माजी कर्णधार डायना एडुलजी (Diana Edulji) यांनी हरमनप्रीतवर टीका केली.
डायनांची टीका
त्या म्हणाल्या की, “ती विचार करत राहिली की, बॅट गुंतली आहे, पण तुम्ही दुसरी धाव पाहिली, तर समजते की, ती जॉगिंग करत होती. जेव्हा हे माहिती आहे की, तुमची विकेट महत्त्वपूर्ण आहे, तर तुम्ही हळू का धावत आहात? तुम्हाला विजयासाठी व्यावसायिक क्रिकेट खेळावे लागेल. एलिसा पेरीने कशाप्रकारे डाईव्ह मारून दोन धावा वाचवल्या होत्या. हेच व्यावसायिक क्रिकेट आहे.” त्यांनी शफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यावरही टीका केली.
डायना म्हणाल्या की, “ते शेवटपर्यंत हार मानत नाहीत आणि आपण लढण्यासाठी बिल्कुल तयार नाही. तुम्ही प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी सामना गमावू शकत नाहीत. तिने विचार केला की, ती आरामात पोहोचेल. आम्हाला 1970च्या दशकात सुनील गावसकरांनी सांगितले होते की, चेंडूवर धाव घेताना तुम्हाला प्रत्येक वेळी तुमची बॅट खेळपट्टीवर टेकवण्यास शिकले पाहिजे. तेव्हाच तुम्हाला ती सवय होईल. तिची बॅट चुकीच्या हातात होती. हरमनने बॅट उजव्या हातात पकडली असती, तर तिला ती स्ट्रेच करता आली असती आणि धाव पूर्ण झाली असती.”
हरमनप्रीतचे वक्तव्य
हरमनप्रीतने तिच्या धावबाद होण्यास दुर्दैवी म्हटले. ती म्हणाली होती की, “जेमिमा रॉड्रिग्जसोबत झालेल्या भागीदारीमुले आम्ही लयीत आलो होतो. त्यानंतर आम्ही पराभूत होण्याची अपेक्षाच नव्हती. ज्याप्रकारे मी धावबाद झाले, त्यापेक्षा जास्त दुर्दैवी काहीच असू शकत नाही.”
ती पुढे म्हणाली की, “मात्र, क्रिकेटमध्ये कधी-कधी असे होते, जे आपल्याला स्वीकार करावे लागते. या संपूर्ण स्पर्धेत आमचा संघ ज्याप्रकारे खेळला आहे, त्याने मी आनंदी आहे. आम्ही ऋचा घोषसारखे काही चांगले प्रदर्शनही पाहिले.”
काय म्हणाली अनुष्का शर्मा?
उपांत्य सामन्यात भारताच्या पराभवानंतर हरमनप्रीतचा एक फोटो समोर आला होता. यामध्ये ती काळ्या चष्म्यामध्ये दिसत होती. हाच फोटो अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. ती म्हणाली की, “तुझा आणि तुझ्या संघाचा नेहमीच अभिमान आहे.”
अंतिम सामना
तसेच, आता रविवारी (दि. 26 फेब्रुवारी) केपटाऊन येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. (women t20 wc semifinal team india former captain diana edulji slams harmanpreet kaur but anushka sharma supports read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेन वॉर्नचा कसोटी रेकॉर्ड तोडण्यासाठी अँडरसन सज्ज! हव्या आहेत फक्त ‘एवढ्या’ विकेट्स
‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने अजिंक्य रहाणेला मागितली मदत, फलंदाजी पाहून झालेला हैराण