जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्युझीलंड संघांदरम्यान 18 जूनपासून सुरू होत आहे. दोन्ही संघ या पहिल्यावहिल्या विजेतेपदावर नाव कोरण्यास उत्सुक असून ते त्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. प्रत्येक स्पर्धेसारखा या स्पर्धेचा अंतिम विजेता देखील एकाच सामन्याद्वारे ठरवला जाणार आहे. परंतु इतर स्पर्धा आणि या स्पर्धेतला महत्वाचा फरक म्हणजे ही स्पर्धा गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी संघांनी केलेल्या 2 वर्षांच्या मेहनतीचा अंतिम निकाल हा फक्त एकाच सामन्याद्वारे ठरवला जाणे, ही अनेकांना न पटणारी गोष्ट ठरली आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील अंतिम विजेता हा एका सामन्याद्वारे न ठरवता 3 सामन्यांच्या मालिकेद्वारे ठरवला जावा, असे मत मांडले आहे. त्यानंतर यावर आता आयसीसीने आपला निर्णय दिला आहे.
आयसीसीने स्पष्ट केले की, या स्पर्धेचा अंतिम विजेता तीन सामन्यांच्या मालिकेद्वारे ठरवणे हे मोठे जिकरीचे काम ठरणार आहे. असे नियोजन हे फक्त ठराविक आदर्श परिस्थितीतच होऊ शकते. आयसीसीचे अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ एलार्डीस यांनी सांगितले की, “हा विचार प्रत्यक्षात लागू करणे कठीण आहे. कारण व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांतून एक महिन्याचा वेळ काढणे सोपी गोष्ट नाही.”
तीन सामन्यांच्या मालिकेसाठी महिन्याचा अवधी कठीण-
यावर्षी सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रापुर्वी एलार्डीस यांनी 14 जूनला शास्त्रींच्या मताबद्दल चर्चा केली. वृत्त एजन्सी पिटीआयने एलार्डीस यांचा हवाला देतांना लिहिले की, “एका आदर्श स्थितीत तीन सामन्यांच्या मालिकेद्वारे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम विजेता ठरवला जाणे ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद ठरेल. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वास्तविकता लक्षात घेता आपल्याला फक्त यासाठी एका महिन्याचा अवधी मिळणार नाही. स्पर्धेच्या अंतिम निकालाकरीता सगळ्या संघांना एका महिन्याकरिता रोखून ठेवणे शक्य होणार नाही. त्यामुळे फक्त एकाच सामन्याद्वारे अंतिम सामन्याचा निकाल ठरवण्याचा निर्णय घेतला गेला.”
अतिरिक्त दिवसाचा पर्याय-
आयसीसीने विश्व कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये इतर कसोटी सामन्यांच्या तुलनेत एक महत्वाचा बदल केला आहे. साउथटम्पमध्ये होण्याऱ्या या अंतिम सामन्याकरिता 5 दिवसांसोबत एक अतिरिक्त सहावा दिवस देखील ठेवण्यात आला आहे, जो पाऊस किंवा कुठल्याही कारणास्तव दिवसाचा खेळ खराब झाल्यास त्या बदल्यात वापरला जाईल. परंतु पहिल्या पाच दिवसातच जर सामन्याचा अपेक्षित निकाल लागला; तर सहाव्या दिवशीचा खेळ होणार नाही. मग सामना अनिर्णित राहिला तरी हरकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाबरोबर शास्त्री ‘डॉगी विंस्टन’चेही बनले गुरू, प्रशिक्षण देतानाचा व्हिडिओ तूफान व्हायरल
WTC Final: कसोटीत ५ शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजाला नारळ, चाहत्यांकडून टिकेचा भडिमार
पुजाराच्या टिकाकारांना सचिनने सुनावली खरीखोटी; म्हणाला, ‘त्याच्यामुळेच भारत कसोटीत यशस्वी’