आयपीएलचा हंगाम 19 सप्टेंबर पासून दुबई येथे सुरु होणार आहे. ही एक कठीण स्पर्धा आहे. इथे खेळाडूला शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर लक्ष द्यावे लागते. प्रशिक्षकही आपल्या खेळाडूंच्या तंदरुस्ती आणि कामगिरीवर बारीक नजर ठेवून असतात. सामान्यादरम्यान खेळाडूंना दुखापतीचासुद्धा सामना करावा सांगतो. मुंबई इंडियन्स संघाचा अष्टैपैलू हार्दिक पंड्या पाठीच्या दुखापतीमुळे मागच्या बऱ्याच दिवसांपासून एकही सामना खेळलेला नाही. मागच्या वर्षी त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर तो आता आयपीएलमधून क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल.
19 सप्टेंबर रोजी मुबंई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात हार्दिक पंड्या मैदानात उतरण्यास तयार आहे. श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मुंबई इंडियन्स संघाचा प्रशिक्षक माहेला जयवर्धने याने गुरुवारी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हटले की, “हार्दिक दुखापतीतून पुनरागमन करीत आहे. तो नेट सरावादरम्यान खूपच चांगली कामगिरी करीत आहे. असे असले तरी आपण त्याचे परीक्षण केले पाहिजे. दोन्ही पंड्या बंधूंनी गेल्या तीन-चार वर्षांत मुंबईच्या संघाकडून खेळतांना महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.”
हार्दिकला पुन्हा फिनिशरची भूमिका दिली जाईल का, असे जयवर्धनेला विचारले गेले तेव्हा तो म्हणाला, “यापूर्वी हार्दिक पंड्या आयपीएल सामन्यादरम्यान आपल्याला वेगवेगळ्या भूमिका निभावतांना दिसला.आमच्याकडे असेही काही खेळाडू आहेत जे फिनिशरची भूमिका निभावू शकतात, म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही कोणत्याही खेळाडूला सामना फिनिशर म्हणून संधी देऊ शकतो.”
हार्दिक पंड्या मोठे फटके खेळू शकतो. 2019 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट 191.42 होता. खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आल्यानंतरही त्याने 400 धावा केल्या होत्या. हार्दिक बळी घेण्यासाठीही सक्षम आहे. त्याने आयपीएलच्या 66 सामन्यांत 28.86 च्या सरासरीने 1068 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 9.06 च्या इकॉनॉमीने 42 बळीही घेतले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ख्रिस लिन हा मुंबईकडे सलामीवीर म्हणून एक पर्याय आहे, परंतु स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि डावखुरा फलंदाज क्विंटन डि कॉक या सलामीच्या जोडीमध्ये बदल होणार नाही, असे जयवर्धनेने स्पष्ट केले. तो म्हणाला, “पर्याय असणे चांगले आहे. ख्रिस लिन उत्तम खेळाडू आहे, परंतु आमच्याकडे रोहित आणि क्विंटनची जोडी आहे. आम्ही याच जोडीला संधी देऊ. ख्रिस लिनच्या उपस्थितीने आमच्याकडे एक पर्याय असेल.”
यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वात संघ पाचवे आयपीएल विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स 4 वेळा आयपीएलचे जेतेपद मिळविणारा एकमेव संघ आहे. 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये मुंबई संघ चॅम्पियन बनला होता. मागच्या हंगामात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला एका धावानी पराभूत करून ट्रॉफी जिंकली होती.
मुंबई इंडियन्स संघ:
रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, क्रुणाल पंड्या, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चाहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, आदित्य तारे, सुचित रॉय, धवल कुलकर्णी, क्विंटन डि कॉक, कायरान पोलार्ड, जेम्स पॅटिन्सन, मिशेल मॅक्लेनघन, ख्रिस लिन , सौरभ तिवारी, नॅथन कुल्टर नाईल , मोसिन खान, दिग्विजय देशमुख, ट्रेंट बोल्ट