महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामातील अंतिम सामन्याचा थरार गुरुवारी, 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:30 वाजता रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील ही लढाई फक्त ट्रॉफीची नाही, तर कौशल्य आणि विक्रमांची लढत ठरणार आहे.
दिल्लीसाठी ही इतिहासातील चौथी सलग अंतिम फेरी असून जेमिमाह रॉड्रिग्सच्या नेतृत्वाखाली संघाने पुन्हा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. आरसीबीसाठीही ही दुसरी अंतिम फेरी असून 2024 मध्ये संघाने पहिल्याच प्रयत्नात डब्ल्यूपीएल ट्रॉफी उंचावली होती. गेल्या तीन मोसमांत दिल्लीला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता; आता जेमिमाह कॅप्टन म्हणून ट्राॅफीचा दुष्काळ संपवेल का, की स्मृती मानधना आरसीबीला दुसरी ट्रॉफी मिळवून देईल? हा थरार काही तासांत उलगडणार आहे.
या सामन्यात स्मृती मानधनाला फक्त संघासाठीच नव्हे तर स्वतःसाठीही महत्त्वाची कामगिरी करण्याची संधी आहे. 8 सामन्यांमध्ये 290 धावा करून तिसऱ्या स्थानावर असलेली स्मृती, अंतिम सामन्यात 53 धावा करुन मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन हरमनप्रीत कौरच्या 342 धावांच्या विक्रमाची धुरा पार करू शकते. जर स्मृती 64 धावा केली, तर ती डब्ल्यूपीएलमध्ये 1 हजार धावा करणारी पाचवी महिला फलंदाज आणि आरसीबीची पहिली महिला फलंदाज ठरेल. आतापर्यंत 4 हंगामात 34 सामन्यांमध्ये तिने 936 धावा केल्या आहेत.
हरमनप्रीत एकमेव कर्णधार आहे जिने संघाला 2 डब्ल्यूपीएल ट्रॉफी जिंकवल्या आहेत. स्मृतीने आरसीबीला जिंकवल्यास ती या विक्रमाची बरोबरी करणारी दुसरी कर्णधार बनेल. अंतिम सामन्यात स्मृती काय विक्रम करेल, हे निकालानंतर स्पष्ट होईल.






