भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. न्यूझीलंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या दिवशी (२९ नोव्हेंबर) २८० धावा करायचा आहेत. ज्यावेळी भारतीय संघ अडचणीत होता, त्यावेळी वृद्धिमान साहाने संयमी अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. या खेळीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दरम्यान फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी देखील त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
वृद्धिमान साहाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देत विक्रम राठोड म्हणाले की, “त्याला मानेची दुखापत झाली होती, हे माहीत असूनसुद्धा तो संघासाठी तेच करेल, ज्या गोष्टीची संघाला गरज आहे. संघ अडचणीत असताना त्याने महत्वाची खेळी केली.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “आम्ही त्याच्याकडून नेहमी अपेक्षा करतो की, त्याने असा खेळाडू व्हावं ज्यावर आम्ही विश्वास ठेऊ शकतो. त्याने आज ते दाखवून दिले की असे का आहे. पण, आमच्याकडे अतिशय खास खेळाडू आहे, रिषभ पंत तो आमचा पहिल्या क्रमांकाचा यष्टिरक्षक आहे. त्याने गेल्या काही वर्षांपासून आमच्या संघासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. जेव्हा रिषभ पंत उपलब्ध नसेल, त्यावेळी आम्हाला वृद्धिमान साहाची आवश्यकता भासते.”
न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या डावात वृद्धिमान साहा काही वेळ यष्टिरक्षण केल्यानंतर मैदानाबाहेर गेला होता. त्याच्या मानेचा त्रास सुरू झाला होता. त्याच्या ऐवजी केएस भरत यष्टिरक्षण करण्यासाठी आला होता. परंतु, दुसऱ्या डावात वृद्धिमान साहा फलंदाजी करण्यासाठी आला आणि त्याने संघ अडचणीत असताना संयमी खेळी केली. त्याने १२६ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ६५ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दुसरा डाव २३४ धावांवर घोषित केला आणि पहिल्या डावात घेतलेल्या ४९ धावांच्या आघाडीच्या जोरावर न्यूझीलंडला २८४ धावांचे आव्हान दिले.
महत्त्वाच्या बातम्या –
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज
कानपूर कसोटीत भारत की न्यूझीलंड, कोण मारणार बाजी? दिग्गजाने केली भविष्यवाणी
कानपूर कसोटीत अखेरच्या दिवशी श्रीकर भरत करणार साहाऐवजी यष्टीरक्षण, बीसीसीआयने सांगितले कारण