भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा न्युझीलंड संघाला पहिल्या डावामध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली, तेव्हा भारतीय वेगवान गोलंदाज काही विशिष्ट कामगिरी करू शकले नाही. त्यामुळे भारतीय गोलंदाजीबद्दल विविध मते सध्या मांडली जात आहेत. नुकतेच न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू सायमन डौल यांनीही आपली मते मांडली आहेत.
त्यांच्या मते अंतिम सामन्याअगोदर सराव कमी झाल्याचा परिणाम भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांमध्ये दिसून येत आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्याअगोदर न्यूझीलंड संघाला यजमान इंग्लंड संघाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु, तेच भारतीय संघाला सराव सामन्यासाठी वेळ कमी मिळाला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मागील कसोटी मालिका फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळली होती. या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध 3-1 ने विजय मिळवला होता.
डौल यांनी क्रिकबजच्या कार्यक्रमादरम्यान हर्षा भोगले यांना सांगितले की, ‘खूप वेळा तुम्ही हे बघता आणि विचार करू लागता की भारतीय संघाला सरावासाठी पुरेशी संधी मिळाली आहे का? मला तर असे वाटते की, त्यांना पुरेसा वेळ मिळाला आहे. कारण मागील 10-12 दिवस यांनी गोलंदाजी केली. ज्यामुळे हे निश्चित आहे की त्यांना सारावासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. परंतु सराव सामना महत्त्वाचा असतो.’
ते पुढे म्हणाले, ‘तुम्ही तुमच्या खेळाडूंचे दोन संघ करून सामना खेळायचा प्रयत्न करू शकता. परंतु, हे पुरेसे नाही. सराव सामन्याप्रमाणे खेळणे खूप अवघड आहे. जो तुम्हाला चांगली कामगिरी करण्यास सक्षम बनवेल आणि तुम्ही यामुळे मुख्य सामन्यासाठी तयार होता.’
भारतीय संघाने या सामन्यापूर्वी आपल्यातच दोन संघ करुन सराव सामना खेळला होता. याव्यतिरिक्त भारतीय संघाला दुसऱ्या संघासह सराव सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
डौल यांनी सांगितले की, न्यूझीलंडच्या पहिल्या डावात भारतीय वेगवान गोलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली नाही. यांचा परिणाम असा झाला की, भारतीय संघाला न्यूझीलंड संघाचे तिसऱ्या दिवसाखेर फक्त दोन फलंदाज बाद करण्यात यश मिळाले. तर 101 धावा न्यूझीलंडने केल्या.
द रोज बाउल स्टेडियमवर हा सामना होत आहे. या स्टेडियमवरील खेळपट्टी वेगवान गोलंदाजाना अनुकूल आहे. असे असतानाही जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांचा चेंडू अधिक स्विंग झाला नाही. मात्र, दुसरीकडे न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज काइल जेमीसनने 31 धावा देत 5 बळी घेतले. नील वॅग्नरने 40 धावा देत 2 बळी घेतले. तर ट्रेंट बोल्टने 47 धावा देत 2 बळी घेतले. या गोलंदाजांनी अनुकूल परिस्थितीचा फायदा घेत भारतीय संघाला 217 धावांमध्ये रोखले.
डौल यांनी सांगितले की, न्यूझीलंड संघाला इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या दोन कसोटी सामन्यांचा या अंतिम सामन्यात नक्कीच फायदा होत आहे.
त्यांनी सांगितले की, न्यूझीलंड संघ लॉर्ड्समध्ये आपल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याचप्रमाणे उतरला होता, ज्याप्रमाणे सध्या भारतीय संघ मैदानावर उतरला आहे. डौल पुढे म्हणाले की, न्यूझीलंड संघ जवळ जवळ 10 ते 11 दिवस साउथॅम्पटनमध्ये राहिला होता. त्यांनी आपापल्या संघात सराव केला, ते लॉर्ड्समध्ये खेळताना लयीत दिसत होते.
डौल पुढे म्हणाले, ‘टिम साउदीने उत्कृष्ट गोलंदाजी केली. डेवोन कॉनवेने दहा दिवस नेटमध्ये सराव केल्यानंतर लॉर्ड्स मैदानावर द्विशतक झळकावले. असे वाटत होते की, ते एकदम तयारीत आहेत.’
डौल म्हणाले की, ‘ईशांत शर्माला सोडून भारतीय संघात खेळणाऱ्या 11 खेळाडूपैकी कोणत्याही खेळाडूला स्विंग गोलंदाजी करता येत नाही. परंतु मला माहिती आहे की, जसप्रीत बुमराह चेंडूला स्विंग करू शकतो. ईशांत शर्मादेखील स्विंग गोलंदाज आहे. तो राउंड द विकेट गोलंदाजी करत त्या अँगलसोबत मनगटाच्या सहाय्याने बाहेरच्या दिशेने स्विंग करतो. तो चेंडूला डावखुऱ्या फलंदाजापासून दूर आणि उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी आतल्या बाजूला ठेवतो.’
डौल म्हणाले की, ‘मोहम्मद शमी स्विंग गोलंदाजी करत नाही. तो सीम गोलंदाज आहे. माझ्यासाठी बुमराह, शमी नाही तर ईशांत शर्मा अधिक महत्त्वपूर्ण आहे. मी त्याच्याकडून चेंडूला अधिक सीम करण्याची आशा ठेवली होती. शमी आणि बुमराहने कधीकधी सीम गोलंदाजी केली आहे. परंतु ते सतत सीम गोलंदाजी करू शकत शकले नाहीत.’
या सामन्याचा चौथा दिवस पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
उसेन बोल्ट झाला जुळ्या मुलांचा पिता, हटके नावे ठेवल्याने आला चर्चेत
पावसामुळे किवी खेळाडू ‘हा’ इनडोअर खेळ खेळण्यात झाले दंग; फोटो व्हायरल
कसोटी क्रिकेटमध्ये का आहे अश्विन सर्वोत्तम गोलंदाज? बुमराहने सांगितले कारण