रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध संघांपैकी एक संघ आहे. अगदी पहिल्या हंगामापासून संघात अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसले. मात्र, सोळा वर्षानंतर देखील संघाला एकदाही विजेतेपद पटकावता आले नाही. संघाच्या या आतापर्यंतच्या अपयशाबद्दल आरसीबीचा माजी गोलंदाज युजवेंद्र चहल नुकताच बोलला.
आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज असलेला चहल सध्या राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळतो. 2022 आयपीएल लिलावात राजस्थानने त्याला आपल्या संघात सामील केले होते. तत्पूर्वी तब्बल आठ वर्ष तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा भाग होता. मात्र, या काळात संघ एकदाही स्पर्धा न जिंकल्याचे आपल्याला वाईट वाटते असे तो म्हणाला. एका यु ट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला,
“2016 मध्ये आम्हाला आयपीएल जिंकण्याची चांगली संधी होती. त्या संपूर्ण हंगामात विराट अगदी वेगळ्या दर्जाचा खेळला. गेल, राहुल आणि वॉटसन यांच्यासारखे मोठे खेळाडू आमच्याकडे होते. अंतिम सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर होऊन देखील आम्ही अगदी शेवटी थोड्या फरकाने पराभूत झालो.”
याच मुलाखतीत आपल्याला आरसीबीने रिटेन न केल्याने तसेच लिलावात पुन्हा विकत न घेतल्याने रागावलो होतो याची कबुली देखील दिली. संघ व्यवस्थापनाने माझ्याशी योग्य संवाद साधला नाही याचे दुःख वाटते असे देखील तो म्हणाला. तसेच विराटने आपल्यावर पुरेपूर विश्वास दाखवला असे देखील त्याने म्हटले.
चहल हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्स, आरसीबी व राजस्थान रॉयल्स या संघासाठी खेळला. त्याने आतापर्यंत 145 सामने खेळताना सर्वाधिक 187 बळी मिळवले आहेत.
(Yuzvendra Chahal Speaks On Why RCB Not Winning IPL)
महत्त्वाच्या बातम्या-
आरंभ है प्रचंड! बेंगलोरमध्ये तयार होतेय वर्ल्डकपसाठीची टीम इंडिया
रोहितने दिलेल्या सल्ल्यामूळे बदलले तिलक वर्माचे करियर! लहानपणीच्या प्रशिक्षकांचा मोठा खुलासा






