भारतीय क्रिकेट संघ पुढील चार महिन्यात अत्यंत व्यस्त असणार आहे. भारताला या कालावधीत आशिया चषक आणि वनडे विश्वचषक या दोन महत्त्वाच्या स्पर्धा खेळायच्या आहेत. या दोन्ही स्पर्धांसाठी मजबूत संघ पाठवण्याचा प्रयत्न असेल. मात्र, त्याचवेळी नियमित भारतीय संघातील काही सदस्य दुखापतीशी झुंज देत आहेत. या सर्व खेळाडूंच्या पुनर्वसनाचे काम युद्ध पातळीवर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी एनसीए बेंगलोर येथे सुरू आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे स्थान अगदी महत्त्वाचे आहे. भारतीय खेळाडूंच्या दुखापतीनंतर त्यांचे पुनर्वसन तसेच युवा खेळाडूंच्या कौशल्याला धार देण्याचे काम या ठिकाणी होते. सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक म्हणून भारताचे सर्वकालीन महान फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण हे काम पाहत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारताचे दुखापतग्रस्त असलेले अनेक महत्त्वाचे क्रिकेटपटू रिकव्हर होण्याचा प्रयत्न करतायेत.
मागील जवळपास वर्षभरापासून भारतीय संघातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्या त्याच्या तंदुरुस्तीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. पाठीच्या दुखापतीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो आता एनसीएमध्ये रोज दहा षटके गोलंदाजी करताना दिसतोय. आगामी आयर्लंड दौऱ्यावर त्याची भारतीय संघात निवड होऊ शकते. त्याच्या बरोबरीनेच मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापत झालेला श्रेयस अय्यर हा देखील तंदुरुस्त होऊन आयर्लंडविरुद्ध खेळू शकतो.
वर्षाच्या सुरुवातीला दुखापत झालेला युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हादेखील तंदुरुस्तीच्या अंतिम टप्प्यात आला आहे. तसेच आयपीएलमध्ये दुखापत झालेला अनुभवी फलंदाज केएल राहुल हा तंदुरुस्त होण्यासाठी आणखी वेळ घेऊ शकतो. मात्र, आशिया चषकात तो खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. तो देखील या सर्व खेळाडूंप्रमाणेच एनसीएत घाम गाळताना दिसतोय.
(Team India Main Players Having Fitness And Rehab In NCA Including Bumrah Shreyas Rahul)
महत्त्वाच्या बातम्या-
चौथ्या ऍशेस कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर! कर्णधार स्टोक्सने घेतला मोठा निर्णय
आयर्लंड दौऱ्यावर लक्ष्मण बनणार भारतीय संघाचा कोच; द्रविडला ब्रेक, पण कॅप्टन कोण?