---Advertisement---

आयसीसीकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत २०२०-२१ कसोटी मालिकेचा मोठा गौरव; भारतीय चाहते ऐकून होतील खूश

On: बुधवार, जून 9, 2021 8:35 AM
Team-India
---Advertisement---

पुढील आठवड्यात पहिल्या-वहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी भारतीय चाहत्यांना आनंद देणारी एक गोष्ट घडली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२०-२१ ला ‘द अल्टिमेट टेस्ट सिरीज’चा सन्मान दिला आहे.

आयसीसीने ट्विटर केले की ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी आम्ही ‘द अल्टिमेट टेस्ट सिरीज’ निवडण्याचा निर्णय घेतला. १५ आमने-सामने झाल्यानंतर आणि आमच्या एकूण सोशल चॅनल्समधून आलेल्या ७ मिनियन मतांनंतर आपल्याला विजेता मिळाला आहे. २०२०-२१ बॉर्डर-गावसकर ट्रॉफीने विजेतेपदाचा मान मिळवला आहे.’

आयसीसीने २ आठवड्यांपूर्वी ‘द अल्टिमेट टेस्ट सिरीज’चा मान देण्यासाठी स्पर्धा सुरु केली होती. त्यासाठी आयसीसीने १६ मालिकांची अंतिम निवड केली होती. त्यातून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया २००१, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत २०२०-२१, भारत विरुद्ध पाकिस्तान १९९९ आणि ऍशेस २००५ या मालिका अंतिम ४ च्या टप्प्यात म्हणजे उपांत्य फेरीत पोहचल्या.

उपांत्य फेरीत २००१ साली झालेली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका आणि २०२०-२१ ला झालेली ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत मालिका आमने-सामने होते. त्यातून २०२०-२१ ला झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत मालिकेने बाजी मारत अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे १९९९ साली झालेली भारत विरुद्ध पाकिस्तान मालिका आणि २००५ ची ऍशेस मालिका उपांत्यफेरीसाठी आमने-सामने होते. त्यातून १९९९ साली झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान मालिकने अंतिम फेरी गाठली.

अखेर अंतिम फेरीत २०२०-२१ ला झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत मालिकेने वर्चस्व राखत ‘द अल्टिमेट टेस्ट सिरीज’चा मान पटकावला.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२०-२१ मध्ये भारताने २-१ अशा फरकाने विजय मिळवला होता. या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला होता. तसेच पहिल्या सामन्यानंतर भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला होता. अशा परिस्थितीत भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मालिकेत जबरदस्त पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला आव्हान दिले होते.

विशेष म्हणजे या मालिकेत भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने अनेक युवा खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले होते. त्यामुळे अननुभवी भारतीय संघाने मिळवलेल्या या विजयाचे सर्वच स्तरातून कौतुक झाले होते. या मालिकेतील अखेरचा सामना ब्रिस्बेन येथील गॅबा मैदानावर झाला होता. हा सामना जिंकून भारतीय संघाने इतिहास रचला होता. साल १९८८ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला गॅबा येथे पराभूत करण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

वाढदिवस विशेष: प्रेक्षकांचा आवडता ऑस्ट्रेलियन खेळाडू दारुमुळे संपला, वाचा ‘त्या’ क्रिकेटरची कहाणी

धोनीला भारतीय संघाकडून डच्चू देण्याचे माजी निवडकर्त्यानी कारण केले स्पष्ट; म्हणाले, ‘कठोर निर्णय घ्यावे लागतात’

उर्वरित आयपीएलच्या आयोजनावर संकट, ‘या’ कारणामुळे आयसीसीने घातला खोडा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---