आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात व्हायला जवळपास २ आठवडे उरले आहेत. अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआय मोठ्या संकटात सापडले असल्याचे दिसत आहे. युएईतील कठोर कोरोना व्हायरस नियम बीसीसीआयपुढील संकटाचे सर्वात मोठे कारण ठरले आहेत. BCCI Stuck In UAE Covid-19 Protocols
भारतातील कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता आयपीएल २०२०चे युएईमध्ये आयोजन करण्यात आले आहे. अशात दुबई, अबु दाबी आणि शारजाह या ३ ठिकाणी हे आयपीएल सामने होणार आहेत. पण, अबु दाबी शहरातील कोरोना व्हायरसच्या नियमांमुळे बीसीसीआयची चिंता वाढली आहे. परिस्थिती अशी उद्भवली आहे की, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असणारी बीसीसीआय युएई सरकारला कोरोना व्हायरसच्या नियमांमध्ये थोडी सूट देण्याची विनंती करत आहे.
माध्यमातील वृत्तांनुसार, आयपीएल गवर्निंग काउंसिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल आणि सीईओ हेमंग अमीन हे सध्या युएईमध्ये आहेत. ते तिथे शारजाह, दुबई आणि अबु दाबीच्या सरकारला कोरोना व्हायरसच्या नियमांमध्ये सूट देण्याची विनंती करत आहेत.
युएई सरकारच्या कोरोना व्हायरस नियमांपैकी एक नियम असा आहे की, जर कोणताही व्यक्ती दुबईवरुन अबु दाबीला जाणार असेल. तर त्याची सीमारेषेवर कोरोना चाचणी करण्यात येईल. यासाठी जवळपास अडीच तास लागतील. त्यानंतर त्या व्यक्तीला अबु दाबीमध्ये ४८ तासांच्या आत आपला कोरोना निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागेल.
अशात जर आयपीएल खेळाडूंवरही हा नियम लागू करण्यात आला. तर, विराट कोहलीच्या आरसीबी आणि एमएस धोनीच्या सीएसके संघांना दुबईवरुन अबु दाबीला जाण्यापुर्वी दुबईच्या सीमेवर लाइनमध्ये उभा राहून आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी लागेल. म्हणून बीसीसीआयचे अधिकारी युएई सरकारशी आयपीएलमधील खेळाडूंची त्यांच्या हॉटेलमध्ये चाचणी करण्याची परवानगी देण्याविषयी चर्चा करत आहेत.
आयपीएलची सुरुवात होण्यापुर्वीच अनेक संकटे उद्भवत असल्याचे दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघातील १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे अजूनही आयपीएल कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली नाही. अशात माध्यमातील वृत्तांनुसार, आयपीएलच्या एका फ्रंचायझी अधिकाऱ्याला आयपीएल रद्द होण्याची भिती वाटत आहे.
“मुद्दा हा आहे की, बीसीसीआयला आयपीएल रद्द करायचे असेल तर त्यांनी आजच करावे. बीसीसीआय १५ दिवसांनंतर आयपीएल रद्द करु शकत नाही. सर्व संघ युएईमध्ये आहेत आणि सर्वांनी संघावर खूप पैसा खर्च केला आहे. सर्व आयपीएल संघांनी आपापल्या खेळाडूंना केवळ आयपीएलसाठी बोलावले आहे. अशात त्यांना त्यांचे पैसेदेखील द्यावे लागणार. आम्ही त्यांना नाही म्हणू शकत की. तुम्ही सामने खेळले नाहीत. तर आम्ही तुम्हाला पैसे नाही देऊ शकणार,” असे बोलताना त्या फ्रंचायझी अधिकाऱ्याने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
वयाची चाळीशी जवळ आली तरी ‘या’ क्रिकेटरची नाही तोड, नोंदवलाय टी२० कारकिर्दीतील मोठा पराक्रम