मुंबई । एकेकाळी खास मित्र असलेले इमरान खान आणि जावेद मियांदाद यांच्या मैत्रित दुरावा आला आहे. इम्रान खान हे पंतप्रधान आहेत आणि त्यांच्यासाठी प्रचार करणारे जावेद मियांदाद सध्या निवांत आहेत. इम्रान पंतप्रधान झाल्यास त्यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये मोठे स्थान मिळेल, अशी आशा मियांदादने व्यक्त केली होती. दोन वर्षांनंतर, मियांदादला काहीच मिळाले नाही. आता या माजी फलंदाजाने इम्रानविरुद्ध उघडपणे टीका करण्यास सुरुवात केली आहे.
मियांदादने एका व्हिडिओमध्ये म्हटले की, “इम्रान खान हा देश आणि क्रिकेटची दुर्दशा यासाठी जबाबदार आहे. मी मदत केली नसती तर इम्रान पंतप्रधान बनला नसता. इम्रानने देशाचा विश्वासघात केला. आता मी त्यांना राजकारण शिकवणार आहे.”
ते म्हणाले, “जर माझी एखादी गोष्ट चुकीची असेल तर इम्रानने त्याचा खुलासा केला पाहिजे. पंतप्रधान मनमानी करीत आहेत. आणि जे लोक देशाशी वाईट वागतात त्यांना मी सोडणार नाही.”
पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये चुकीच्या लोकांची नेमणूक केल्याचा आरोप इम्रानवर मियांदादने केला. ते म्हणाले, “इम्रान स्वत: ला देव मानू लागला आहे. मनमानी निर्णय घेत आहेत. त्याला वाटते की पीसीबी (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) चालवण्यास सक्षम असे कोणतेही लोक नाहीत. म्हणूनच, त्याने बोर्डवर परदेशी लोक नेमले आहेत, ज्यांना क्रिकेटबद्दल काहीही माहिती नाही. जर बोर्डात बसलेले परदेशी भ्रष्टाचार करुन पळून गेले तर त्यांना पकडणार कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.”
मियांदादचा इशारा पीसीबीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान आणि अध्यक्ष एहसान मनी यांच्यावर होता. दोघांचेही यूकेचे नागरिकत्व आहे. मियांदाद यांना आशा होती की त्यांना अध्यक्षपद मिळेल. पण तसे झाले नाही. आता त्यांना संताप येऊ लागला आहे.
स्थानिक क्रिकेटपटू बेरोजगार
1992 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेले मियांदाद यांनी इम्रानवर स्थानिक क्रिकेटपटूंना बेरोजगार केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘इम्रानने जाणीवपूर्वक डिपार्टमेंट क्रिकेट बंद केले. यामुळे खेळाडू बेरोजगार झाले आहेत. याचे उत्तर कोण देईल?”