नव्वदच्या दशकातील भारतीय क्रिकेट संघातील एक नाव सर्वांनाच परिचित आहे ते म्हणजे मनोज प्रभाकर. मनोज प्रभाकर, त्यावेळी कपिल देव यांच्यानंतर भारताला मिळालेला पहिला मध्यमगती गोलंदाजी आणि बऱ्यापैकी फलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू. दिल्लीच्या या उंचपुऱ्या खेळाडूकडे क्रिकेटला आवश्यक सर्व कौशल्ये कमी-जास्त प्रमाणात होती. पण, मनोज प्रभाकरची क्रिकेट कारकीर्द जास्त लांब जाऊ शकली नाही. याला कारण होता एक श्रीलंकन खेळाडू सनथ जयसूर्या.
१९८७ नंतर नऊ वर्षांनी क्रिकेट विश्वचषक आशिया खंडात परतला होता. जगमोहन दालमिया यांनी क्रिकेटला एक व्यवसायिक स्वरूप दिले. भारत पाकिस्तान व श्रीलंका स्पर्धेचे यजमान होते. संपूर्ण दक्षिण आशियात उत्साहाचे वातावरण तयार झालेले. भारतीय संघ बऱ्यापैकी मजबूत होता. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात सचिन तेंडुलकर, नवज्योत सिंग सिद्धू, अजय जडेजा, विनोद कांबळी, अनिल कुंबळे, व्यंकटेश प्रसाद, संजय मांजरेकर, मनोज प्रभाकर असे तगडे खेळाडू भारतीय संघात सामील होते.
भारताने केनिया आणि वेस्टइंडीज हरवत चांगली सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने मात्र पराभवाचा धक्का दिला. पुढचा सामना श्रीलंकेविरुद्ध दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर होणार होता. भारतासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. कारण पुढील दोन सामने झिंबाब्वे व पाकिस्तान या बेभरवशी संघांविरुद्ध होते.
अर्जुन रणतुंगाने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सचिन तेंडुलकरसोबत सलामीची जबाबदारी लोकल बॉय मनोज प्रभाकर याच्यावर सोपविण्यात आली. मनोज प्रभाकर मध्यमगती स्विंग गोलंदाजी करत. सोबतच फलंदाजीतही चांगले हात दाखवत. त्यामुळे कर्णधार अझरुद्दीन व संघ व्यवस्थापन त्याला सलामीला पाठवत. मनोज प्रभाकर काहीसा अहंकारी वृत्तीने वागत. अनेकदा असे म्हणत, मी कपिल पाजींपेक्षा जरा सरसच आहे. परंतु त्याला माहीत नव्हते आज आपल्या सोबत काय होणार आहे.
फलंदाजी सुरू झाली आणि फॉर्मात असणारा सचिन आपल्या नेहमीच्या अंदाजात खेळू लागला. दुसरीकडे मनोजला चामिंडा वासने त्रस्त करून सोडले. वास त्याच्या बॅटलाच बॉल लागू देत नव्हता. कधी कानापासून बाउन्सर तर कधी ग्लोव्ह्जपासून स्विंग. संघाच्या ९ षटकात फक्त २७ धावा झाल्या होत्या. लोकल बॉय असूनही प्रेक्षक त्याची हुर्यो उडवत होते. शेवटी मनोजला दबाव झेलता आला नाही आणि पुष्पकुमाराच्या गोलंदाजीवर ३६ चेंडूत अवघ्या ७ धावा बनवून तो बाद झाला. बाद झाल्याबद्दल घरच्याच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवण्याचे नामुष्की त्याच्यावर आली.
पुढे, सचिनच्या १३७ व कर्णधार अझरुद्दीनच्या नाबाद ७२ खेळ्यांच्या बळावर भारताने २७१ धावा रचल्या. त्यावेळी ही धावसंख्या बऱ्यापैकी मोठी होती. भारताची गोलंदाजीही चांगली असल्याने श्रीलंकेला हरवू अशी आशा निर्माण झाली.
श्रीलंकेचा डाव सुरू करण्यासाठी सनथ जयसूर्या आणि रोमेश कालूवितरणा ही तुफानी जोडी मैदानावर उतरली. या दोघांनी त्या विश्वचषकात पहिल्या दहा षटकांत वेगवान धावा काढायचा धडाका लावला होता. भारताकडून पहिले षटक मनोज प्रभाकर टाकण्यासाठी आला. फलंदाजीत काहीही न करता आल्याने आता गोलंदाजीत त्याची भरपाई करायची असे त्याने ठरवले.
पहिल्याच षटकात कालूवितरणाने दोन चौकार मारत दमदार सुरुवात केली. मनोजच्या पहिल्या षटकात ११ धावा गेल्या. दुसरे षटक श्रीनाथने ८ धावा देत संपवले. पुन्हा मनोज प्रभाकर आपले वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आला. यावेळी मात्र त्याच्यासमोर होता सनथ जयसूर्या.
जयसूर्याने पहिला चेंडू मिड ऑनला उचलून चौकार मारला. दुसरा चेंडू सरळ प्रेक्षकांत भिरकावला. तिसरा वेगवान चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर सलग तीन सणसणीत चौकार मारत जयसूर्याने मनोज प्रभाकरची हवा घालवली. मनोज प्रभाकरचे तोंड पाहण्यासारखे झाले. एकाच षटकात २२ धावा निघाल्या होत्या. टी२० च्या जमान्यात हे नेहमी होते परंतु त्यावेळी ही गोष्ट रोज रोज होत नसत. दिल्लीकर प्रेक्षकांमधून मनोज प्रभाकरला अस्सल दिल्लीच्या शिव्या देण्यात येत होत्या.
मनोजच्या गोलंदाजीचे हाल पाहून कर्णधार अझरुद्दीनने त्याची गोलंदाजी बंद केली. व्यंकटेश प्रसाद, श्रीनाथ व कुंबळे या कर्नाटकच्या तिकडीने लंकन फलंदाजांना जखडून ठेवले. सोबत सचिन देखील किफायतशीर षटके टाकत होता. कुंबळेने अतिआक्रमक झालेल्या जयसूर्याला ७९ धावांवर बाद केले.
इतर गोलंदाजांवरील ताण कमी करण्यासाठी पुन्हा चेंडू मनोजकडे देण्यात आला. कारण, तो प्रमुख गोलंदाज होता आणि त्याची अजून ८ षटके शिल्लक होती.
यावेळी मात्र मनोज प्रभाकरने वेगवान गोलंदाजी ऐवजी फिरकी गोलंदाजी करायला सुरुवात केली. कारण, सचिन व कुंबळे यांना चांगली मदत मिळत होती. दुसरीकडे प्रेक्षक शिव्या देत होते तर समालोचक हसत होते. वेगवान गोलंदाज फिरकी गोलंदाजी करतोय हे चित्र नवीन होते. यावेळी अर्जुन रणतुंगा व हसन तिलकरत्ने यांनी त्याचा समाचार घेतला. मनोज प्रभाकरच्या गोलंदाजीचे सामन्यातील पृथक्करण होते ४-०-४७-०.
शेवटी व्हायचे तेच झाले. सामना भारताने गमावला आणि याचे सर्व श्रेय अर्थातच मनोज प्रभाकर यालाच मिळाले. मैदानावरील आणि टीव्हीवर सामना पाहणाऱ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांनी मन भरून त्याला शिव्या दिल्या होत्या. समीक्षक आणि वृत्तपत्रवाल्यांनी तर त्याच्यावर चांगलीच आगपाखड केली.
हा सामना मनोज प्रभाकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अखेरचा सामना ठरला. त्याला त्या वर्ल्डकपमधील पुढील एकही सामना खेळायला मिळाला नाही. १९९९ मॅच फिक्सिंग प्रकरणात देखील त्याचे नाव आले. मनोज प्रभाकरने स्वतः कबूल केले की, “जयसूर्याच्या त्या एका षटकातील हल्ल्याने माझ्या कारकीर्दीचे नुकसान झाले. ”
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्याने प्रशिक्षक म्हणून काम केले. अफगाणिस्तान क्रिकेट संघ व दिल्ली रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याने काम पाहिले. समालोचक म्हणूनही अधून-मधून तो टीव्हीवर दिसत असतो. याच मनोज प्रभाकरचा आज (१५ एप्रिल) ५९ वा वाढदिवस आहे.
वाचा-
२ भारतीय क्रिकेटपटूंसह धर्म बदलणारे जगातील क्रिकेटर, एकाने केला पगडीचा त्याग तर दुसऱ्याने