आयपीएल संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाचे आव्हान पेलण्यासाठी तयारी करत आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला असून, या दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात २७ नोव्हेंबरपासून वनडे सामन्याने होणार आहे.
शेवटच्या दौऱ्यात जेव्हा भारत ऑस्ट्रेलियाला गेला होता, तेव्हा वनडे आणि कसोटी सामन्यांत यशस्वी ठरला होता. पण तेव्हा बंदीमुळे डेविड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ दोघेही ऑस्ट्रेलिया संघात नव्हते. परंतु यावेळी हे दोन्हीही फलंदाज ऑस्ट्रेलिया संघात असून वॉर्नरने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली आहे.
भारताविरुद्धच्या वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पगडा आहे पण गेल्या काही वर्षांत दोन्ही संघामध्ये जबरदस्त टक्कर पाहावयास मिळाली आहे. या दौऱ्यात बर्याच कालावधीनंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला जाणार असून, संघाचा वनडे मालिका जिंकून जोरदार सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अनेक वनडे सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून शानदार विजय मिळवले आहेत.
या लेखाच्या माध्यमातून आपण भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धावांच्या दृष्टीने ३ सर्वात मोठ्या विजयांबद्दल जाणून घेणार आहोत.
३. १०७ धावा, (पर्थ, १९९१)
भारतीय संघाने ८ डिसेंबर १९९१ रोजी बेन्सन अॅण्ड हेजेज जागतिक मालिकेच्या दुसर्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून श्रीकांतची ६० धावांची खेळी आणि बाकी खेळाडूंच्या छोट्या-छोट्या खेळींमुळे भारताने निर्धारित ५० षटकांत ७ खेळाडू गमावून २०८ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ रवी शास्त्रींच्या गोलंदाजीसमोर कोलमडून पडला. शास्त्रींनी ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलिया संघ १०१ धावांवर कोसळला आणि भारताने हा सामना १०७ धावांनी जिंकला.
२. ११८ धावा, (इंदोर, २००१)
सन २००१ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने वनडे मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर डाव सुरू करण्यासाठी आले. द्रविड १५ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर सचिन आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना टक्कर दिली. सचिनने १२५ चेंडूत १३९ धावा केल्या, तर लक्ष्मणने ८३ धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळींमुळे भारताने ५० षटकांत ८ खेळाडू गमावून २९९ धावा केल्या.
भारताने दिलेल्या ३०० धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ उतरला होता. ऑस्ट्रेलियाकडून ऍडम गिलख्रिस्ट (६३) वगळता कुठलाही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही. त्यामुळे पूर्ण संघ ३५.५ षटकांत १८१ धावांवर कोलमडून पडला. अशाप्रकारे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११८ धावांनी वनडे क्रिकेटमधला दुसरा सर्वात मोठा विजय नोंदवला.
१. ११८ धावा, (चेम्सफोर्ड, १९८३)
सन १९८३ विश्वचषक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताकडून कोणत्याही फलंदाजाने मोठा डाव खेळला नाही. पण सर्व फलंदाजांनी उपयुक्त खेळी खेळल्या. यशपाल शर्माने सर्वाधिक ४० धावा केल्या. भारताने ५५.५ षटकांत सर्व गडी गमावून २४७ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ मदन लाल आणि रोजर बिन्नीच्या गोलंदाजीसमोर गडगडला आणि ३८.२ षटकांतच १२९ धावा बनवून संपूर्ण संघ ढेपाळला. भारताने ११८ धावांनी हा सामना जिंकला.
वाचा-
“विराट शिवाय टीम इंडिया म्हणजे स्मिथ, वॉर्नर शिवाय ऑस्ट्रेलिया”
क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! एकाच दिवशी ६ संघ खेळणार क्रिकेट, रंगणार ३ आंतरराष्ट्रीय सामने
‘रोहित आणि इशांतला कसोटी मालिका खेळायची असेल तर ३-४ दिवसात विमानात बसावे लागेल, अन्यथा..’