क्रिकेटमध्ये अनेक विक्रम बनतात व यातले अनेक विक्रम हे मोडलेही जातात. काही विक्रम मोडण्यासाठी अनेक वर्षांचा अवधी लागतो. परंतु काही असेही विक्रम असेही असतात जे मोडले जात नाही तर त्यांची केवळ बरोबरी केली जाते.
यातील एक विक्रम अर्थातच कारकिर्दीतील पहिल्या चेंडूवर घेतलेली विकेट. हा विक्रम कधीही मोडला जात नाही तर याची केवळ बरोबरी होऊ शकते. या लेखात भारताकडून पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची माहिती घेणार आहोत. bowlers who have taken a wicket off their first ball.
६. निलेश कुलकर्णी (कसोटी, ३ ऑगस्ट १९९७)
निलेश कुलकर्णी यांनी श्रीलंकेविरुद्ध कोलंबो कसोटीत १९९७ मध्ये कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर मरावान आटापटूला बाद करत विकेट घेतली होती. या कसोटीपुर्वी त्यांनी एक वनडे सामना खेळला होता परंतु कसोटीतील त्यांचे पदार्पण याच सामन्याने झाले. भारताकडून कसोटीत अशी कामगिरी करणारे ते एकमेव खेळाडू आहेत.
५.सदागोपन रमेश (वनडे, ५ सप्टेंबर १९९९)
सलामीवीर सदागोपन रमेश यांनी वनडे व कसोटीत १९ कसोटी व २४ वनडे सामने खेळले. २४ वनडेपैकी त्यांना १५व्या वनडेत पहिल्यांदा गोलंदाजी देण्यात आली व त्यातील पहिल्याच चेंडूवर त्यांनी निक्सन मॅक्लेन या वेस्ट इंडिजच्या खेळाडूला तंबूत पाठवले. जरी पदार्पणात नसली तरी सदागोपन रमेश यांनी वनडे कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली.
याच सामन्यात कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर वाॅवेल हायंड्सने एमएसके प्रसाद यांना बाद केले होते. वाॅवेल हायंड्सचा हा पहिलाच वनडे सामना होता.
४. भुवनेश्वर कुमार (वनडे, ३० डिसेंबर २०१२)
पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर आला असताना चेन्नईमध्ये ३० डिसेंबर २०१२ रोजी भुवनेश्वर कुमारने वनडे पदार्पण केले. तत्पुर्वी २५ ऑगस्ट २०१२ रोजी त्याने टी२० पदार्पण केले होते. चेन्नई वनडेत भुवनेश्वरने भारताकडून गोलंदाजीसाठी येत पहिल्याच चेंडूवर मोहम्मद हफिजला त्रिफळाचीत केले. याबरोबर वनडे पदार्पणात भारताकडून पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो पहिला व एकमेव गोलंदाज ठरला.
३. अजित आगरकर (टी२०, १ डिसेंबर २००६)
भारतीय संघातील एकवेळचा प्रमुख गोलंदाज असलेल्या अजित आगरकरने १९९८मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तर कारकिर्दीतील पहिला टी२० सामना १ डिसेंबर २००६ रोजी जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेसोबत खेळला. या सामन्यात आगरकरबरोबर सर्वच भारतीय टी२० पदार्पण करत होते. कारण हा भारताचा पहिलाच टी२० सामना होता. गोलंदाजीला आलेल्या आगरकरने या सामन्यात हर्षल गिब्जला रैनाकडे झेल द्यायला लावून तंबूत पाठवले. यामुळे टी२० पदार्पणात विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला.
२. प्रग्यान ओझा (टी२०, ६ जून २००९)
२००९ ते २०१३ या काळात प्रग्यान ओझा भारताकडून क्रिकेट खेळला. यात त्याने २४ कसोटी, १८ वनडे व ६ टी२० सामने खेळले. ओझाने आपले टी२० पदार्पण हे नाॅटींग्घमला ६ जून २००९ रोजी केले. यात त्याने ४ षटकांत २१ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या परंतु याच सामन्यात त्याने वैयक्तिक पहिल्याच चेंडूवर त्याने जुनेद सिद्दीकी या बांगलादेशच्या फलंदाजाला बाद केले. यामुळे टी२० पदार्पणात विकेट घेणारा तो भारताचा दुसरा गोलंदाज ठरला.
१. विराट कोहली (टी२०, ३१ ऑगस्ट २०११)
भारताचा स्टार कर्णधार असलेल्या विराट कोहलीच्या नावावर असाही काही विक्रम असेल याचा कुणीही विचार केला नसेल. विराटने २००८मध्ये वनडेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले तर पहिला कसोटी सामना तो २०११ व टी२० सामना २०१०मध्ये खेळला.
विराटने वनडेत ४ व टी२०मध्ये ४ विकेट्स घेतल्या आहेत. असे असले तरी विराटला टी२०मध्ये तो खेळत असलेल्या पाचव्या सामन्यात गोलंदाजीची संधी मिळाली. या सामन्यात कर्णधार एमएस धोनीने त्याला गोलंदाजी दिली व पहिल्याच चेंडूवर त्याने केविन पीटरसनला धोनीकरवी यष्टीचीत केले. विराटची ही टी२०मधील पहिल्याच चेंडूवर घेतलेली विकेट होती. विशेष म्हणजे हा चेंडू वाईड बाॅल होता.
ट्रेंडिंग घडामोडी –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
वनडेत क्रिकेटमध्ये एका षटकात १७ चेंडू टाकणारा गोलंदाज
३ कधीही विचार न केलेले विक्रम आहेत भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर