भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली नेहमीच एक दिग्गज कर्णधार म्हणून ओळखला जातो. पण त्याने भारतीय संघाचे शानदार नेतृत्व करण्याबरोबरच अनेकदा वैयक्तिकरित्या चांगली कामगिरी केली आहे.
तो वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याने वनडेमध्ये ३११ सामन्यात ४१.०२ च्या सरासरीने ११३६३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २२ शतकांचा आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. अनेकदा त्याच्या चांगल्या खेळीमुळे भारताने विजय मिळवले आहेत. पण त्याचबरोबर त्याने काही सामन्यात इतकी धीम्या गतीने धावा केल्या की त्यामुळे भारताला पराभव स्विकारावे लागले.
असे ३ वनडे सामने ज्यात गांगुलीने केली धीम्यागतीने फलंदाजी –
१. १०४ चेंडूत ५४ धावा – टायटन कप १९९६ विरुद्ध दक्षिण आफ्रिका
१९९६ ला टायटन कपमध्ये चौथा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात जयपूर येथे झाला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला विजयासाठी २५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून सलामीला गांगुली आणि सचिन तेंडुलकर उतरले.
पण त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच जखडून ठेवले होते. त्यामुळे त्यांना धावांची गती वाढवता येत नव्हती. त्यांनी सुरुवातीला विकेट गमावली नाही. पण त्यांनी धीमी सुरुवात दिली होती. त्यांनी १२६ धावांची सलामी भागीदारी केली.
मात्र सचिन ३१ व्या षटकात ९३ चेंडूत ६४ धावा करुन बाद झाला. त्यावेळी सचिनपेक्षाही गांगुलीने धीम्या गतीने फलंदाजी केली. गांगुली १०४ चेंडूत ३ चौकारांसह ५४ धावा करुन बाद झाला. त्यावेळी भारताच्या ३ बाद १४८ धावा झाल्या होत्या. तसेच भारताने द्रविडची विकेटही शून्य धावेवरच गमावली होती.
नंतर कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने ६० चेंडूत ५६ धावा केल्या. परंतू तोपर्यंत भारताला विजयासाठी लागणारी धावगती जवळजवळ आवाक्यबाहेर गेली होती. त्याचबरोबर सुरुवातीला धीम्यागतीने खेळ झाल्याने अखेर भारताला हा सामना २७ धावांनी गमवावा लागला.
२. ३८ चेंडूत १५ धावा – २००४ पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिकेतील दुसरा सामना
२००४ ला भारत पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना रोमांचकारी झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने भारताला विजयासाठी ३३० धावांचे दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सेहवाग आणि सचिनेने भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. पण ९ व्या षटकात सेहवाग बाद झाला. त्यानंतर लगेचच १२ व्या षटकात व्हीव्हीएस लक्ष्मण बाद झाला. तोपर्यंत भारताने ७१ धावा केल्या होत्या.
यानंतर चौथ्या क्रमांकावर गांगुली खेळायला आला. पण गांगुलीला त्याच्या धावांची गती वाढवता येत नव्हती. त्याने आणि सचिनने १२.१ षटके एकत्र फलंदाजी केली. परंतू त्यांना केवळ ६९ धावाच करता आल्या. त्यातही गांगुलीच्या ३८ चेंडूतील केवळ १५ धावांचा वाटा होता. तर सचिनने ३९ चेंडूत ३६ धावांचा वाटा उचलला होता.
गांगुली २४व्या षटकात बाद झाला. पण तोपर्यंत भारताला ७ पेक्षा अधिकची सरासरीने धावा कराव्या लागणार होते. त्या सामन्यात सचिनने भारताला विजयापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. त्याने १४१ धावांची खेळीही केली. परंतू सचिन ३९ व्या षटकात बाद झाल्यानंतर भारतीय संघ ४८.४ षटकातच ३१७ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताला केवळ १२ धावांनी पराभव स्विकारावा लागला. त्या सामन्यात गांगुली थोडा जलदगतीने खेळला असता तर कदाचित भारत विजय मिळवू शकला असता.
३. ११० चेंडूत ५१ धावा – इंडियन ऑईल कप २००५ विरुद्ध श्रीलंका
२००५ ला इंडियन ऑईल कपमध्ये चौथा सामना भारत विरुद्ध श्रीलंका संघात दांबुला येथे झाला होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्यण घेतला होता. यावेळी भारताकडून सलामीला गांगुलीसह सेहवाग मैदानात उतरला होता.
यावेळी गांगुली फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसत होता. त्याने या सामन्यात ११० चेंडूत ५१ धावांची खेळी केली. त्याने खेळलेले तब्बल ७० चेंडू निर्धाव ठरले होते. भारताने त्या सामन्यात ५० षटकात केवळ २२० धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे भारताने दिलेले केवळ २२१ धावांचे आव्हान श्रीलंकेने जयवर्धनेने कलेल्या ९४ धावांच्या खेळीच्या जोरावर ४८ षटकात सहज पार केले आणि हा सामना जिंकला.
ट्रेंडिंग घडामोडी –
कॅप्टन कूल धोनी पुन्हा कर्णधार, टीम इंडिया नाही तर संघात मिळाली संधी