क्रिकेटमधील सर्वात कठीण प्रकार म्हणजे कसोटी क्रिकेट. कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी फलंदाजाकडे संयम, तंत्र आणि योग्य शॉट निवडण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. कसोटीमध्ये भरपूर धावा करणाऱ्या फलंदाजाचे खूप कौतुक केले जाते. भारतीय संघातही असे अनेक फलंदाज होऊन गेले आणि आहेत, ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये अनेक शतके ठोकली आहेत; पण वनडेमध्ये त्यांना शतकी खेळी करता आली नाही.
खरं तर वनडे क्रिकेट हे कसोटी क्रिकेटपेक्षा सोपे असल्याचे म्हटले जाते. वनडे क्रिकेटमध्ये खेळपट्टी फलंदाजांसाठी बर्याचदा उपयुक्त ठरते आणि पांढरा बॉल गोलंदाजांना जास्त मदत करत नाही.
या लेखात त्या ५ भारतीय फलंदाजांविषयी सांगणार आहोत. ज्यांनी कसोटीत त्याने अनेक शतके ठोकली आहेत पण वनडे क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी फारशी छाप पाडली नाही. हे सर्व खेळाडू कसोटी क्रिकेटमधील संघाचे महत्त्वपूर्ण सदस्य राहिले आहेत. त्यांना कसोटीतील दिग्गज म्हटलं तरी चालेल.
१. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)
आजच्या काळात कसोटी क्रिकेटमधील काही चांगल्या फलंदाजांपैकी एक भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराचे नाव घेतले जाते. २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियात जेव्हा भारतने कसोटी मालिका जिंकली तेव्हा त्यामध्ये पुजाराची भूमिका सर्वात महत्वाची होती.
चेतेश्वर पुजाराने भारतीय संघासाठी कसोटीमध्ये ७७ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ४८.६७ च्या सरासरीने ५८४० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने १८ शतके आणि २५ अर्धशतकेही केली आहेत. दरम्यान, त्याने ३ वेळा दुहेरी शतकही केले आहे. त्याला कसोटीत भारताचा स्टार फलंदाज म्हटले जाते. कसोटीत सध्या त्याच्यावर संघाची मधली फळी सांभाळण्याची जबाबदारी आहे.
पण वनडेमध्ये पुजाराला केवळ ५ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्यामध्ये त्याने फक्त १०.२ च्या सरासरीने केवळ ५१ धावा केल्या आहेत.
२. मुरली विजय (Murali Vijay)
एकेकाळी कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघाचा नियमित सलामीवीर फलंदाज मुरली विजयही या यादीत आहे. मुरली विजयला चेतेश्वर पुजारापेक्षा वनडे क्रिकेटमध्ये खेळण्याची जास्त संधी मिळाली. पण तो कधीही शतकी खेळी करू शकला नाही.
मुरली विजयने भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये ६१ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ३८.२९ च्या सरासरीने ३९८२ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १२ शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. मुरली विजयला एकूण १७ वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये त्याने २१.१९ च्या सरासरीने ३३९ धावा केल्या आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये तो स्वत: ला कधीच सिद्ध करु शकला नाही. यानंतर त्याच्यावर कसोटी क्रिकेटपटूचा शिक्का बसला. यामुळे त्याला पुन्हा वनडे खेळण्याची संधी मिळाली नाही. विजयला ९ टी-२० सामनेही खेळायला मिळाले. ज्यामध्ये त्याने १६९ धावा केल्या.
३. वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha)
या यादीत यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाचेही नाव आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वृद्धीमान साहाला फारशी संधी मिळालेली नाही. परंतु जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने त्या संधीचा फायदा घेतला नाही. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची कारकीर्द जास्त बहरली नाही.
वृद्धिमान साहाने भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये ३७ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ३०.२ च्या सरासरीने १२३८ धावा केल्या आहेत. ज्यात ३ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. साहालाही ९ वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये त्याने १३.६७ च्या सरासरीने फक्त ४१ धावा केल्या.साहाला वनडेमध्ये जास्त संधी मिळू शकल्या नाहीत कारण एमएस धोनी त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी करत होता. त्यामुळे तो वनडे स्वरूपात भारतीय संघाकडून जास्त खेळू शकला नाही. तो भारताच्या कसोटी संघाचा नियमित खेळाडू आहे.
४. आर अश्विन (Ravichandran Ashwin)
अष्टपैलू म्हणून आपली ओळख निर्माण करणारा भारतीय गोलंदाज आर अश्विनने ही अजून वनडे प्रकारात शतक केले नाही. अश्विनने कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघासाठी फलंदाजीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ज्यामध्ये काही महत्त्वपूर्ण प्रसंगी त्याच्या बॅटमधून शतकही निघाले आहे.
अश्विनने भारतीय संघासाठी आतापर्यंत ७१ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २८.११ च्या सरासरीने २३८९ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने ४ शतके आणि ११ अर्धशतके झळकावली आहेत. कसोटी गोलंदाजीत त्याने २५.४३ च्या सरासरीने ३६५ विकेट घेतल्या आहेत. ज्यामध्ये ७ वेळा १० विकेट घेतल्या आहेत.
अश्विनने १११ वनडे सामन्यात १६.०७ च्या सरासरीने ६७५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये फक्त एक अर्धशतक आहे. वनडे गोलंदाजीत १५० विकेट त्याने घेतल्या आहेत. कसोटीत अश्विन ज्या प्रकारचे फलंदाजी करतो तसा तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना दिसत नाही.
५. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal)
गेल्या १५ महिन्यांपासून मयंक अग्रवाल कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहे. यामुळे तो भविष्यात भारतीय कसोटी संघातील एक धुरंदर असू शकतो असे मत आहे. मयंकने संधीचा जबरदस्त फायदा घेतला आहे. त्याने संघासाठी अनेक महत्त्वाच्या खेळी खेळल्या आहेत. पण वनडे क्रिकेटमध्ये तो आपली छाप पाडू शकला नाही.
मयंक अग्रवालने भारतीय संघासाठी आतापर्यंत ११ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ५७.२९ च्या सरासरीने ९७४ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने ३ शतके आणि ४ अर्धशतके ठोकली आहेत. तर दोन दुहेरी शतकेही केली आहेत. मयंकने आता कसोटी संघात स्वत: चे स्थान निश्चित केले आहे.
मात्र अग्रवालने आतापर्यंत फक्त ३ वनडे सामने खेळले आहेत. त्यातही तो फारशी प्रभावी कामगिरी करु शकलेला नाही. त्याने १२ च्या सरासरीने ३६ धावा केल्या आहेत. अजून काही वर्षे तरी वनडेत रोहित आणि शिखरची सलामीजोडी पाहायला मिळणार आहे. अशा प्रसंगी मयंकला अधिक खेळण्याची संधी मिळणे कठीण आहे.
वाचनीय लेख –
–आयपीएल २०२० स्पर्धा युएईमध्ये झाली तर या ४ संघांना होणार फायदा
–आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या ह्या ५ खेळाडूंनी आजही केली असती दमदार कामगिरी…
वनडे सामन्यात एकही विकेट न घेता सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणारे ५ गोलंदाज