मागील अनेक वर्षांपासून भारताचा सलमीवीर फलंदाज रोहित शर्मा भारताच्या वनडे आणि टी२० संघाचे उपकर्णधारपद सांभाळत आहे. तसेच त्याने अनेकदा भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थिती भारतीय संघाचे चांगले नेतृत्वही केले आहे.
रोहितने याआधी आशिया चषकात, निदाहास ट्रॉफी, अशा महत्त्वाच्या मालिकांमध्ये नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्याला एखाद्या क्रिकेट प्रकारात भारतीय संघाचा कर्णधार करायला हवे, असे बऱ्याच जणांनी म्हटले होते.
या लेखात रोहितला वनडे किंवा टी२० संघाचा कर्णधार का करायला हवं याच्या कारणांचा आढावा घेण्यात आला आहे.
१. विराट कोहलीच्या खांद्यावरील नेतृत्वाची जबाबदारी कमी होईल –
सध्या विराट तिन्ही क्रिकेट प्रकारासाठी भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्यातच तो भारताचा वरच्या फळीतील एक अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. त्याच्या फलंदाजीवर भारतीय संघ बराचसा अवलंबून आहे. त्यामुळे त्याच्यावर फलंदाजी करण्याबरोबरच नेतृत्व करण्याचीही मोठी जबाबदारी आहे.
तसेच तो सातत्याने क्रिकेट खेळत असतो. त्यामुळे त्याच्यावर शारिरिक आणि मानसिक दृष्ट्या जबाबदाऱ्या पडत आहेत. त्यामुळे निदान वनडे किंवा टी२० संघाचे रोहितला कर्णधारपद दिले; तर विराटच्या खांद्यावरील जबाबदारीचे ओझे थोडे कमी होऊ शकते.
२. रोहित एक यशस्वी कर्णधार –
रोहितने आत्तापर्यंत १० वनडे सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यातील ८ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर २ सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे. त्याचबरोबर रोहितने १९ टी२० सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यातील केवळ ४ सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे. तर १५ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
तसेेच रोहितने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना स्वत:ला कर्णधार म्हणून सिद्ध केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या ५ मोसामांचे आयपीएल विजेतेपद मिळवले आहे. तो आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधार आहे.
त्यामुळे रोहितचा भारताचा नियमित कर्णधार म्हणून विचार केला जाऊ शकतो.
३. कर्णधार असताना रोहितची वैयक्तिक चांगली कामगिरी –
रोहितने जेव्हाही भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे, तेव्हा त्याने वैयक्तित चांगली कामगिरीही केली आहे. रोहितने टी२० संघाचे १९ सामन्यात कर्णधारपद सांभाळताना २ शतकेही केले आहेत. तसेच ५ अर्धशतके केली आहे. त्याने कर्णधार म्हणून ४१.८८ च्या सरासरीने ७१२ धावा केल्या आहेत.
तर वनडेत त्याने १० सामन्यात नेतृत्व करताना तब्बल ७७.५७ च्या सरासरीेने ५४३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २०८ धावांच्या द्विशतकी खेळीचाही समावेश आहे.
एवढेच नाही तर, रोहितची आयपीएलमध्ये कर्णधार झाल्यानंतरचीही कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की कर्णधारपदामुळे रोहितमधील सर्वोत्तम कामगिरी बाहेर येते.
४. खेळाडूंवर विश्वास दाखवतो –
रोहित बऱ्याचदा नेतृत्व करताना खेळाडूंना पाठिंबा देताना आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवताना दिसतो. अनेकदा भारतीय गोलंदाजांनी या बद्दल बोलून दाखवले आहे. ज्यावेळी भुवनेश्वर कुमार पाठीच्या दुखापतीतून पुनरागमन करत होता त्यावेळी आशिया चषकात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी फॉर्ममध्ये असणाऱ्या खलील अहमदला संघात संधी द्यायला हवी असे अनेकांनी म्हटले होते.
पण रोहितने भुवनेश्वरवर विश्वास दाखवताना त्याला संघात स्थान दिले. भुवनेश्वरने त्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली होती. इतकेच नाही तर रोहित आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना खेळाडूंवर पूर्ण विश्वास ठेवतो. त्यामुळे तो संघात फार कमी बदल करतो. त्याच्या या विश्वासामुळे भारतीय संघाला हार्दिक, कृणाल हे पंड्या बंधू, जसप्रीत बुमराह सारखे खेळाडू आयपीएलमधून मिळाले आहेत. त्यामुळे तो एक संघ नायक म्हणूनही यशस्वी ठरत असल्याने भारताचे नेतृत्व करु शकतो.
५. खेळ चांगला समण्याची क्षमता –
रोहित हा तसा स्वभावाने शांत खेळाडू आहे. त्याचबरोबर तो खेळही चांगल्या प्रकारे समजतो. त्यामुळे त्याला क्षेत्ररक्षण लावताना किंवा गोलंदाजीत बदल करताना जास्त समस्या येत नाही. तसेच त्याने क्षेत्ररक्षण लावताना आणि गोलंदाजीत बदल करताना घेतलेले काही निर्णय भारतीय संघासाठी महत्त्वाचे देखील ठरले आहेत.
तो बऱ्याचदा नवीन फलंदाज खेळायला आला की संघातील सर्वोत्तम गोलंदाजाला गोलंदाजी देतो. जेणेकरुन विकेट घेण्याच्या संधी वाढतील. तसेच रोहित सामन्यातील परिस्थिती, फलंदाजांची ताकद आणि कमजोरी पाहून गोलंदाजी बदलण्याचा निर्णय घेतो.
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष – ‘हिटमॅन’ अशी ओळख मिळवलेल्या रोहित शर्माबद्दल फारशा माहित नसलेल्या १० गोष्टी
वाढदिवस विशेष: रोहित शर्माचे ‘हे’ ५ विक्रम कोणत्याही खेळाडूला मोडणे केवळ अशक्य