१९५२ ला भारताने इंग्लंड दौरा केला होता. या दौऱ्यात भारतीय संघ ४ कसोटी सामने खेळणार होता. या मालिकेतील पहिल्या २ कसोटीत भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. परंतू तरीही दोन्ही सामन्यात भारताने पराभव स्विकारला होता. त्यामुळे तिसरा सामना महत्त्वाचा होता.
तिसरा सामना १७ ते १९ जूलै १९५२ ला मँचेस्टर येथे पार पडला होता. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्या डावात जवळजवळ अडीच दिवस फलंदाजी केली.
इंग्लंडकडून कर्णधार लिओनार्ज हटनने १०४ धावांची शतकी खेळी केली. तसेच पिटर मे (६९) आणि गॉडफ्रे इव्हान(७१) यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिला डाव तिसऱ्या दिवशी ९ बाद ३४७ धावांवर घोषित केला.
भारताचा पहिला डाव केवळ ५८ धावांवर संपुष्टात
तिसऱ्या दिवशी भारतीय संघ जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा भारतीय फलंदाज इंग्लंडच्या माऱ्यासमोर टिकाव धरु शकले नाहीत. भारताचा पहिला डाव केवळ ५८ धावांवर तिसऱ्याच दिवशी संपुष्टात आला. भारताकडून केवळ कर्णधार विजय हजारे(१६) आणि विजय मांजरेकर (२२) यांनाच दोनआकडी धावसंख्या पार करता आली. इंग्लंडकडून पहिल्या डावात फ्रेड ट्रूमॅनने ८. ४ षटके गोलंदाजी करताना ८ विकेट्स घेतल्या.
२८९ धावांनी पिछाडीवर राहिलेल्या भारताला इंग्लंडने फॉलोऑन दिला. त्यामुळे लगेचच पुन्हा भारताला फलंदाजीला यावे लागले.
दुसऱ्या डावातही भारताचा डाव कोसळला –
दुसऱ्या डावातही भारताची तशीच आवस्था राहिली. भारताचा दुसरा डावही तिसरा दिवस संपण्याच्या आधीच केवळ ८२ धावांवर संपुष्टात आला. सलामीवीर फलंदाज पंकज रॉयने २६ मिनिटे फलंदाजी केली, पण ते शुन्यावरच बाद झाले. नंतर विजय हजारे आणि हेमू अधिकारी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण अधिकारी रिटायर्ड हर्ट झाले. त्यानंतर हजारेही ५१ चेंडूंचा सामना केल्यानंतर १६ धावांवर बाद झाले. अधिकारी परत फलंदाजीला आल्यानंतर केवळ २ धावा ज्यादाच्या जोडू शकले. ते २७ धावांवर बाद झाले.
भारताकडून या डावात हेमू अधिकारी(२७), विजय हजारे(१६) आणि खोखन सेन(१३) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली; तर इंग्लंडकडून ऍलेक बेडसर यांनी सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
हा सामना इंग्लंडने एक डाव आणि २०७ धावांनी जिंकला. कसोटीमध्ये एकाच दिवसाच एक संघ दोन्ही डावात सर्वबाद होण्याची ही पहिलीच वेळ होती.
२२३ मिनिटात भारताने गमावल्या २० विकेट्स –
भारताचा पहिला डाव ५८ आणि दुसरा डाव ८२ धावांवर संपुष्टात आला होता. पहिल्या डावात भारताने ८७ मिनिटे फलंदाजी केली आणि दुसऱ्या डावात १३६ मिनिटे फलंदाजी केली. म्हणजेच भारताने २२३ मिनिटात २० विकेट्स गमावल्या होत्या.
वाचनीय लेख –
जेव्हा क्रिकेटमध्ये ४ चेंडूत झाल्या होत्या तब्बल ९२ धावा