कोणत्याही खेळात खेळाडूला निवृत्ती ही घ्यावीच लागते. क्रिकेट खेळातही असंच आहे. खेळाडू कधीना कधी निवृत्त होतोच. खेळाडू निवृत्त होतो, पण क्रिकेट थांबत नाही. एका पिढीनंतर क्रिकेट दुसर्या पिढीबरोबर पुढे जाते.
भारतीय कसोटी क्रिकेट संघातही आज असे काही खेळाडू आहेत, जे येत्या काही वर्षात निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही वर्षात भारतीय संघात नवीन चेहेरे दिसू शकतात. या लेखात भारताच्या पुढील पिढीबद्दल जाणून घेणार आहोत, जी ५ वर्षानंतर भारताची कसोटी संघाची धुरा सांभाळू शकेल.
१. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)
पृथ्वी शॉने भारताकडून कसोटी पदार्पण २०१८ ला केले आहे. पदार्पणातील कसोटी सामन्यात त्याने शानदार शतकही झळकावले आणि सामनावीरही ठरला. त्याच्याकडे भारतासाठी कसोटी क्रिकेट दीर्घकाळ खेळण्याची क्षमता आहे. तो आत्ताशी २० वर्षांचा आहे त्यामुळे तो भारतीय क्रिकेटच एक भविष्य आहे, असे जाणकारांनी सुद्धा सांगितले आहे. त्यामुळे ५ वर्षांनंतरही तो कसोटीत भारतासाठी सलामीला जाताना दिसू शकतो.
२. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal)
मयंक अग्रवालने भारतीय कसोटी संघात सलामीवीर म्हणून आपले स्थान निश्चित केले आहे. तो पुढील ७-८ वर्षे भारतीय संघाकडून खेळू शकेल कारण त्याच्याकडे तशी क्षमता आहे. जर तसे झाले तर तो ५ वर्षानंतर पृथ्वी शॉसह भारताकडून कसोटी क्रिकेटमधील डावाची सुरुवात करताना दिसू शकतो.
३. शुबमन गिल (Shubaman Gill) – कर्णधार
शुबमन गिल हा भारताचा युवा उभारता खेळाडू आहे. त्याला देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमधील कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. एवढेच नाही तर त्याने भारत अ आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरीही केली आहे. तो भारताचा पुढील कर्णधार ठरू शकेल. तसेच येत्या काळात तो भारतासाठी नंबर ३ या स्थानावर फलंदाजी करू शकतो. चेतेश्वर पुजाराच्या निवृत्तीनंतर ते या जागेसाठी सर्वात मोठा दावेदार आहे.
४. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)
श्रेयस अय्यर वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये भारतासाठी चांगले प्रदर्शन करत आहे. आता त्याला लवकरच कसोटी संघात संधी मिळू शकेल. जर त्याला कसोटी संघात संधी मिळाली तर तो ७-८ वर्षे कसोटी क्रिकेट खेळू शकतो. वनडे आणि टी२० मध्ये तो ज्या क्रमांकाच्या क्रमांकावर फलंदाजी करतो, त्याच ४ क्रमांकावर तो कसोटीमध्येही भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो. त्याने मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे.
५. हनुमा विहारी (Hanuma Vihari)
हनुमा विहारी हादेखील सध्याच्या भारतीय संघाचा एक भाग आहे आणि येत्या काही वर्षांत तो निश्चितच भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू असेल. सध्या तो भारतीय संघासाठी मधल्या फळीत फलंदाजी करतो तसेच तो गोलंदाजीही करु शकतो. त्यामुळे एक अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणूनही तो भारतीय संघात स्थान मिळवू शकतो.
६. हार्दिक पांड्या (Hardik Pandya)
हार्दिक पांड्या आता हा फक्त २७ वर्षांचा आहे. त्यामुळे ५ वर्षांनंतरही तो निश्चितपणे भारतीय कसोटी संघात खेळताना दिसू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये भारताला वेगवान गोलंदाजी सोबतच एक अष्टपैलू खेळाडू आवश्यक आहे आणि हार्दिक पांड्या ही आवश्यकता नक्कीच पूर्ण करू शकेल. हार्दिकसुद्धा ५ वर्षानंतरही भारताच्या कसोटी संघात खेळताना दिसेल यात काही शंका नाही.
७. रिषभ पंत (Rishabh Pant) – यष्टीरक्षक
रिषभ पंत सध्या भारतीय संघासाठी यष्टिरक्षकाची भूमिका साकारत आहे. येत्या काही वर्षांतही तो खेळताना नक्की दिसेल. आता तो अवघ्या २२ वर्षांचा आहे, त्यामुळे त्याची क्रिकेट कारकीर्द अजून बरीच वर्षे बाकी आहे. ५ वर्षांनंतर तो निश्चितपणे आगामी भारतीय कसोटी संघाचा एक भाग असेल.
८. कुलदीप यादव (Kuldeep Yadav)
रवींद्र जडेजा आणि आर अश्विनला ५ वर्षांनंतर खेळणे खूप अवघड असेल. तर कुलदीप यादव हा ५ वर्षांनंतर भारतीय संघाचा आघाडीचा फिरकीपटू होऊ शकतो. कुलदीप यादव अवघ्या २५ वर्षांचा आहे आणि त्याच्याकडे आणखी ८-१० वर्षे भारतीय संघात खेळण्याची क्षमता आहे. आगामी काळात तो भारताचा कसोटीतील आघाडीचा फिरकीपटू असू शकतो.
९. नवदीप सैनी (Navdeep Saini)
नवदीप सैनी एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या वेगवान चेंडूंनी तो जगातील कोणत्याही फलंदाजास गुडघे टेकण्यास भाग पाडू शकतो. जरी नवदीप सैनी आतापर्यंत भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेट खेळू शकलेला नाही, परंतु येत्या ५ वर्षानंतर तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा नियमित सदस्य होऊ शकतो.
१०. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)
मोहम्मद सिराज देखील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली गोलंदाजी करीत असून निवड समितीचे लक्ष वेधून घेत आहे. या युवा वेगवान गोलंदाजाला लाल चेंडूने गोलंदाजी करायला आवडते. हा वेगवान गोलंदाजदेखील भारताच्या आगामी कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग ठरू शकतो.
११. जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah)
जसप्रीत बुमराह सध्या सर्वच प्रकारातील भारतीय संघाचा सर्वात महत्वाचा गोलंदाज आहे. पुढील ६-७ वर्षे तो भारतीय क्रिकेटवर वर्चस्व गाजवतानाही दिसू शकतो. ५ वर्षांनंतरही हा वेगवान गोलंदाज भारताच्या कसोटी गोलंदाजीचे नेतृत्व करू शकतो. त्याच्या चेंडूंचा सामना करणे कोणत्याही फलंदाजाला अवघड आहे.
वाचनीय लेख –
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी या ११ खेळाडूंची होऊ शकते निवड
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारे ५ फलंदाज
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दिग्गज असलेले ३ खेळाडू, जे नाही खेळू शकले जास्त कसोटी क्रिकेट