आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) टी20 वर्ल्ड कप 2026 मधून बांगलादेशला बाहेर काढल्यानंतर क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम पाकिस्तानवर झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आयसीसीच्या या कारवाईनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि पाकिस्तान सरकार यांच्यात हालचालींना वेग आला आहे.
आयसीसीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर 24 जानेवारी रोजी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तान संघ टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळणार की नाही, याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. “आम्ही सरकारशी चर्चा केल्यानंतरच या विषयावर निर्णय घेऊ,” असे नक्वी यांनी सांगितले होते.
मात्र या वक्तव्यानंतर अवघ्या एकाच दिवसात, म्हणजे 25 जानेवारी रोजी, पीसीबीने टी-20 वर्ल्ड कपसाठी आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या घोषणेमुळे पाकिस्तान नक्कीच स्पर्धेत सहभागी होणार, अशी चर्चा सुरू झाली. मात्र संघ जाहीर झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे चीफ सिलेक्टर आकिब जावेद यांनी या मुद्द्यावर सावध भूमिका घेतली.
आकिब जावेद यांनी स्पष्ट केले की, “आम्ही निवड समितीचे सदस्य आहोत आणि आमचं काम संघ निवडणं आहे. आयसीसीने दिलेल्या मुदतीच्या अखेरीस आम्ही संघ जाहीर केला आहे. मात्र पाकिस्तान संघ वर्ल्ड कप खेळणार की नाही, हा निर्णय सरकार घेणार आहे.” त्यामुळे या प्रश्नावर सध्या कोणतेही ठोस उत्तर देता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पाकिस्तान संघाचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. मात्र तरीही पाकिस्तान सरकारची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “आम्ही आयसीसीचे नव्हे, तर आमच्या सरकारचे आदेश पाळतो. पंतप्रधान परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.”
जर पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला, तर आयसीसीकडून कठोर कारवाई आणि मोठ्या निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि सरकारसमोर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील ठरणार आहे.






