यावर्षी खेळला गेलेला टी२० विश्वचषक भारतीय संघासाठी कामगिरीच्या दृष्टीने खास ठरला नाही. तरी, ही स्पर्धा काही वैयक्तीक गोष्टींमुळे चर्चेत राहिली. टी२० विश्वचषकानंतर विराट कोहली टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार होता. तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफचा संघासोबतचा कार्यंकाळ संपणार होता. त्यामुळे ही स्पर्धा या वैयक्तीक कारणांमुळे खास होती.
विराटनंतर आता रोहित शर्माने टी२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच शास्त्रींची जागा राहुल द्रविड घेणार आहे. दरम्यान, विराटने रवी शास्त्रींसाठी ट्वीटरवर एक भावनिक संदेश शेअर केला आहे.
विराटने माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफसाठी एक खास संदेश शेअर केला आहे. त्याने ट्वीटरवर एक खास पोस्ट शेअर करत लिहिले की, “एका संघाच्या रूपात एका अद्भूत प्रवासासाठी आणि सुंदर आठवणींसाठी धन्यवाद. तुमचे योगदान अप्रतिम राहिले आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नेहमी लक्षात ठेवले जाईल. पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.”
विराट आणि शास्त्री यांनी मिळून भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. जरी या दोघांना भारतासाठी आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नसली, तरी त्यांची कर्णधार-प्रशिक्षक म्हणून यशस्वी जोडी राहिली.
Thank you for all the memories and the amazing journey we've had as a team with you all. Your contribution has been immense and will always be remembered in Indian cricket history. Wish you the best moving forward in life. Until next time ⭐???? pic.twitter.com/42hx4Q7cfq
— Virat Kohli (@imVkohli) November 10, 2021
आता टी२० विश्वचषकातील भारतीय संघाचा प्रवास संपल्यानंतर १७ नोव्हेंबरपासून संघ न्यूझीलंडसोबत मायदेशातील मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडसोबत भारतीय संघाला टी२० आणि कसोटी मालिका खेळायच्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेत विराटच्या जागी रोहित शर्मा कर्णधार पदाची जबाबदारी पार पाडणार आहे. तसेच रवी शास्त्रींच्या जागी राहुल द्रविड संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. १७ नोव्हंबरपासून खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवडही करण्यात आली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली असून युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. विश्रांती दिलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा यांचा समावेश आहे, तर वेंकटेश अय्यर, आवेश खान या नवीन खेळाडूंना संघात संधी दिली गेली आहे. तसेच ऋतुराज गायकवाड, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिकचा परतीचा मार्ग झाला खडतर! भारतीय संघात पुनरागमन करण्याआधी कराव्या लागणार ‘या’ गोष्टी
‘एका सामन्याच्या आधारावर राहुल चाहरला कसं वगळलं?’, माजी क्रिकेटरने उपस्थित केला प्रश्न
सोशल मीडियावर ट्रेंड होतोय ‘जस्टीस फॉर संजू सॅमसन’ हॅशटॅग; गंभीर आहे कारण






