इंग्लंड आणि भारत यांच्यात ४ ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ एकदम सज्ज झाले आहेत. ही मालिका दोन्हीही संघासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या मालिकेत कोण विजय मिळवणार? याबाबत अनेक दिग्गज अंदाज व्यक्त करत आहेत. इंग्लंडचे दोन माजी कर्णधार ऍलिस्टर कूक व मायकेल वॉन यांनी देखील याबाबत भाकिते केली आहेत.
हा संघ जिंकणार मालिका
इंग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना कूक म्हणाला, “मला वाटते इंग्लंड संघ सर्व सामन्यांमध्ये मोठ्या धावसंख्या रचून मालिका जिंकेल. बेन स्टोक्स उपलब्ध नसला तरी, इंग्लंड ही मालिका जिंकण्याची अधिक शक्यता आहे. इंग्लंड ही मालिका ३-१ अशा फरकाने जिंकू शकते.”
दुसरीकडे नेहमी भारतीय संघाला लक्ष करणारा माजी कर्णधार मायकेल वॉन याने अनपेक्षितपणे ही मालिका भारतीय संघ आपल्या नावे करेल, असे म्हटले. तो म्हणाला, “मला सांगायला आवडणार नाही मात्र, ही मालिका भारतीय संघ जिंकेल. इंग्लंडमध्ये जिंकण्याची ही भारतीय संघाकडे सर्वोत्कृष्ट संधी आहे. स्टोक्स, वोक्स व आर्चर यांच्या अनुपस्थितीत भारत ३-१ ने मालिका जिंकू शकतो.”
इंग्लंड संघ आहे अडचणीत
इंग्लंड संघ या मालिकेत काहीसा कमजोर समजला जात आहे. त्यांचे युवा फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत नाहीत. दुसरीकडे, अनुभवी अष्टपैलू बेन स्टोक्स याने मानसिक स्वास्थ्याच्या कारणास्तव मालिकेतून माघार घेतली आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स टाचेच्या दुखापतीमुळे पहिल्या दोन तर, जोफ्रा आर्चर कोपराच्या दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेत खेळणार नाहीत.
इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या –
कौतुकास्पद! “कसोटी क्रिकेट टिकवण्यासाठी सर्वस्व झोकून देईल”, विराटने दिला शब्द
बांगलादेश क्रिकेट संघाची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलियावर मिळवला दणदणीत विजय