गेल्या काही दिवसांपासून आयपीएल मध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणं समोर आली होती. खेळाडूंसह सपोर्ट स्टाफ देखील कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. यामुळे सामने देखील रद्द केल्या गेले होते. आज अखेर बीसीसीआयने संपूर्ण आयपीएल हंगामाच अनिश्चित काळासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला.
खेळाडूंची आणि सहभागी अधिकाऱ्यांची व स्टाफची सुरक्षितता लक्षात घेऊन बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. मात्र आता याचा मोठा आर्थिक तोटा बीसीसीआयला सहन करावा लागणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली.
हा अधिकारी म्हणाला, “आम्हाला साधारण २००० ते २५०० कोटींच्या दरम्यानचा तोटा सहन करावा लागणार असल्याची शक्यता आहे. माझ्या अंदाजानुसार २२०० कोटींच्या आसपासची रक्कम हा अचूक आकडा असेल.” जवळपास अर्धा हंगाम रद्द होत असल्याने नुकसानाची रक्कम एवढी मोठी असल्याचे मानल्या जात आहे.
बीसीसीआयचे सगळ्यात मोठे नुकसान स्टार स्पोर्ट्समुळे होणार आहे. स्टार स्पोर्ट्सकडे पाच वर्षांच्या आयपीएल प्रक्षेपणाचे हक्क होते. मात्र आता या हंगामातील अर्धे सामने खेळवल्या गेले नाही, तर ती रक्कम स्टार स्पोर्ट्स बीसीसीआयला अदा करणार नाही. याव्यतिरिक्त आयपीएलचे मुख्य प्रायोजक असलेल्या ‘व्हिवो’ कडून देखील बीसीसीआयला आर्थिक फटका बसेल. व्हिवोकडून बीसीसीआयला संपूर्ण हंगामासाठी ४४० कोटी रुपये येणे अपेक्षित होते. मात्र आता हंगाम अनिश्चित काळासाठी रद्द झाल्याने यातील अर्धीच रक्कम बीसीसीआयला मिळेल.
याशिवाय इतर प्रायोजकांकडून येणार्या रकमेत देखील घट होऊ शकते. अनएकेडमी, ड्रीम इलेव्हन, क्रेड, अपस्टॉक्स आणि टाटा मोटर्स हे सगळे प्रकार यंदाच्या आयपीएल हंगामात सहाय्यक प्रायोजक होते. आता व्हिवो प्रमाणेच ते देखील प्रायोजनाची अर्धीच रक्कम अदा करण्याची शक्यता आहे. थोडक्यात बीसीसीआयला हंगाम रद्द झाल्याचा जबर आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलदरम्यान कोरोनाबाधित झालेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी; बनू शकतो ११ जणांचा एक संघ