इंडियन प्रीमियर लीग २०२२ (आयपीएल २०२२, IPL 2022) चे बिगूल वाजले असून लवकरच या हंगामाची सुरुवातही होणार आहे. २६ मार्च ते २९ मे या कालावधीत भारतात आयपीएलचा पंधरावा हंगाम (IPL 15th Season) खेळवला जाणार आहे. या हंगामात ८ ऐवजी १० संघ सहभागी होणार असणार असल्याने यंदाची आयपीएल रोमांचक असणार आहे. याचदरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) प्रेक्षकांच्या स्टेडियममधील प्रवेशाबाबत (BCCI To Allow Crowd For IPL) मोठा निर्णय घेतला आहे.
क्रिकेटचाहत्यांना मिळणार आयपीएल सामने प्रत्यक्षात पाहण्याची संधी
बीसीसीआयने आयपीएल सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळावा म्हणून बरेच प्रयत्न केले. आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून महाराष्ट्र सरकारने २६ मार्च ते १५ एप्रिल, या कालावधीत महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएल २०२२ च्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी दिली आहे. स्टेडियममधील आसन क्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांना प्रत्यक्षात सामने पाहण्याची अनुमती दिली गेली आहे.
या विषयासंदर्भात बीसीसीआयचे कार्यकारी सीईओ हेमांग अमीन आणि मुंबई क्रिकेट संघाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली आहे. या बैठकीत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. तसेच या बैठकीत आयपीएल १५ च्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांची संख्या वाढवण्याच्या विषयावरही चर्चा झाली आहे. यापूर्वी कोरोनामुळे विनाप्रेक्षक आयपीएल खेळवली गेली आहे.
आयपीएलचा पहिला सामना होणार २६ मार्चला
दरम्यान बीसीसीआयने आयपीएलच्या १५ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार मुंबई आणि पुणे येथील एकूण ५ क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा पूर्ण हंगाम खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्रात, मुंबईतील ३ स्टेडियम आणि पुण्यातील एका स्टेडियमवर होणार आहे. मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील स्टेडियममध्ये ५५ सामने होणार आहेत, तर पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर १५ सामने होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटच्या पहिल्या कसोटीत खेळलेले भारतीय खेळाडू आता करतात तरी काय? घ्या जाणून
अगग! मोठमोठ्या विक्रमांत सोडा, नकोशा विक्रमांतही पंतने धोनीची केलीय बरोबरी; ९६ धावांवर झालाय बाद