इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील झालेल्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघ मजबूत स्थितीत होता. आपल्या दमदार खेळीमुळे भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला १५१ धावांनी पराभूत केले होते. तर पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. त्या सामन्यातही भारतीय संघ जिंकण्याच्या अवस्थेत होता. मात्र, शेवटच्या दिवशी पावसाने सगळा खेळ बिघडवून टाकला.
लॉर्ड्सवरील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास भरपूर वाढला आहे. अशात भारतीय संघाचे लक्ष आता बुधवारपासून (२५ ऑगस्ट) सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यावर असेल. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत आणखीन आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ हा सामना जिंकून मालिकेला बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल.
दरम्यान, भारतीय संघ लीड्सच्या हेडींग्ले मैदानावर पोहोचलेला आहे. तेथे भारतीय संघाने सराव सत्राला देखील सुरुवात केली आहे. अशात तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी एका पत्रकार परिषदेत इंग्लंड विरुद्धच्या रणनीतीबाबत बोलताना, विराट कोहलीने काही गोष्टींवर चर्चा केली. ज्यामध्ये त्याने ५ मोठे वक्तव्य केले आहेत ते खालीलप्रमाणे –
१) आम्ही इंग्लंडच्या संघाला कोणत्याही मैदानावर हरवू शकतो
ज्यावेळी विराट कोहलीला इंग्लंड विरुद्धची मालिका इंग्लंडच्या मुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितीत जिंकण्याबाबत म्हटले गेले यावर तो म्हणाला, “जर इंग्लंडचे सगळे खेळाडू संघात खेळत असते, तरीही आम्ही त्यांना हरवले असते. आम्ही कोणत्याही संघाला कोठेही हरवू शकतो.”
तसेच हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंडचे देखील चांगले प्रदर्शन राहिले आहे. याबाबत बोलताना कोहली म्हणाला, “भलेही आमच्या आत्ताच्या संघाने या मैदानावर कोणता कसोटी सामना खेळाला नसेल. मात्र, आम्ही इंग्लंडला जगातील कोणत्याही मैदानावर जाऊन हरवू शकतो आम्हाला पुढे काय करायचे आहे यावर लक्ष देणे गरजेचे आहे.”
२) भूतकाळातील गोष्टींना जास्त महत्त्व देत नाही.
भारतीय संघाच्या लीड्सवरील आधीच्या कामगिरीबद्दल विचारले असता भूतकाळातील गोष्टींना जास्त महत्त्व देत नसल्याचे कोहली म्हणाला, “मी इतिहासात झालेल्या गोष्टींना जास्त महत्त्व देत नाही. भूतकाळात झालेल्या गोष्टींना विचारात घेऊन काही उपयोग नाही. इतिहास तुम्हाला कोणत्याही गोष्टीची ग्वाही देत नाही. हे सगळं आपल्या मानसिकतेवर अवलंबून असते. आम्ही पुढच्या सामन्यासाठी तयार आहोत.”
३) आम्हाला कोणी डिवचल्यास आम्ही शांत बसणाऱ्यांमधले नाही
दुसऱ्या कसोटी सामन्यात बाबत बोलताना कोहली म्हणाला, “पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यानंतर संघ दुःखी झाला होता. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याच दमदार कामगिरीसह संघ मैदानात उतरला. आम्ही त्या लोकांमधले नाही ज्यांना तुम्ही डिवचल्यावर शांत बसू.”
४) इंग्लंड सारख्या परिस्थितीत फलंदाजी करणे आहे अवघड
कोहलीने इंग्लंडचे मैदान फलंदाजीसाठी कठीण असल्याचे सांगितले. याबाबत बोलताना तो म्हणाला, “इंग्लंडमध्ये आल्यावर तुमचा अहंकार तुम्हाला विसरावा लागतो. इंग्लंडमध्ये कोणत्याही गोष्टीची ग्वाही राहत नाही. तुम्हाला इथे संयम ठेवावा लागतो. याने काहीही फरक पडत नाही, की तुमच्याकडे किती अनुभव आहे? तुम्ही किती धावा केल्या आहेत? तुमची एक चूक तुम्हाला पुन्हा तंबूत पाठवण्यासाठी खूप आहे.”
५) मोहम्मद सिराज एक उत्कृष्ट गोलंदाज आहे
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन करत सामन्याचा निर्णय आपल्याकडे वळवला. या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाज केलेल्या सिराजचे कौतुक करत कोहली म्हणाला, “मला सिराजच्या या उत्कृष्ट खेळीने अजिबात आश्चर्य झाले नाही. ऑस्ट्रेलियातील मालिकेत देखील सिराजने चांगले प्रदर्शन केले होते. ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास खूप वाढला. त्याचे त्याच्यावरील विश्वासामुळे त्याच्या खेळण्याचा स्तरही उंचावला.”
महत्वाच्या बातम्या –
–आयसीसीची ‘मोठी’ कारवाई! यावर्षी कसोटी पदार्पण करणाऱ्या ‘या’ खेळाडूच्या गोलंदाजीवर बंदी
–त्यावेळी जो रूटने ‘असे’ करायला नको होते, संघसहकारी अँडरसननेच दाखवून दिली मोठी चूक
–तुम्ही स्लेजिंगवर लक्ष केंद्रित करत आहात का? अजिंक्य रहाणेने दिले ‘असे’ उत्तर