शानदार फॉर्ममध्ये असलेल्या ऋषभ पंतने (Rishbh Pant) शुक्रवारी सांगितले की एका कसोटीमध्ये नेतृत्व करणे “सर्वोत्तम परिस्थिती” नसते, पण दक्षिण आफ्रिकेसारख्या मजबूत संघाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत काय आव्हान येणार आहे, यावर तो जास्त विचार करत नाही. नियमित कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) दुखापतीमुळे संघातून वगळल्यानंतर पंतला या सामन्याची कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सामना शनिवारी येथे सुरू होणार आहे.
पंतने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले, “एकाच सामन्याची कर्णधारपदाची जबाबदारी ही आदर्श परिस्थिति नसते, पण मला हा मान दिल्याबद्दल मी BCCIचा आभारी आहे. कधी कधी मोठ्या संधीबद्दल खूप विचार केला तर त्याचा काही फायदा होत नाही. तो पुढे म्हणाला, मी जास्त विचार करू इच्छित नाही. पहिला कसोटी सामना आमच्यासाठी कठीण गेला. आता कसोटी जिंकण्यासाठी जे काही करावे लागेल ते आम्हाला करावे लागेल.
ईडन गार्डन्सवरील विजयामुळे दक्षिण आफ्रिका दोन कसोटींच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना गिलला मानदुखीचा त्रास झाला होता आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.
पंतने सांगितले की, गिलच्या बदली कोण खेळणार याचा निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतला आहे, परंतु नाव उघड केले नाही. तो म्हणाला, शुबमनच्या जागी कोण खेळणार हे आम्ही ठरवले आहे. ज्याला संधी मिळणार आहे, त्याला ते आधीच सांगितले आहे.
तो पुढे म्हणाला, मी पारंपरिक पद्धतीनेही विचार करेन आणि गरज पडेल तिथे ‘आउट ऑफ द बॉक्स’ विचारही करेन. योग्य तो समतोल राखायचा आहे. गोष्टी साध्या ठेवायच्या आहेत आणि चांगलं क्रिकेट खेळणारी टीमच जिंकेल.
पंतने गिलच्या लढाऊ वृत्तीचेही कौतुक केले. शुबमन सामना खेळण्यासाठी खूप उत्सुक होता. शरीर साथ देत नसतानाही तो प्रयत्न करत होता. खेळाडूकडून तुम्हाला अशाच वृत्तीची अपेक्षा असते. पंत म्हणाला, मी गिलशी रोज बोलतो. मला काल संध्याकाळीच कर्णधारपदाबद्दल माहिती मिळाली.






