आयपीएल २०२१ स्पर्धा येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. त्याआधी सध्या सुरू असलेल्या विजय हजारे चषक २०२१ स्पर्धेत युवा खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. या स्पर्धेचे लीग सामने समाप्त झाले असून, येत्या ७ मार्च पासून दिल्लीमध्ये बाद फेरीचे सामने खेळवण्यात येणार आहेत. यात मुंबई, केरळ, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, सौराष्ट्र, उत्तराखंड आणि दिल्ली हे संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले आहेत. अशातच बाद फेरीतील सामन्यांपूर्वी केरळ संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील मुख्य खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे.
७ मार्च पासून विजय हजारे चषक स्पर्धेत नॉकआऊट सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. अशातच केरळ संघातील सलामीचा फलंदाज संजू सॅमसन दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. येत्या आयपीएल २०२१ हंगामात संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. त्यामुळे याचा फटका राजस्थान रॉयल्स संघाला देखील बसू शकतो.काही दिवसातच राजस्थान रॉयल्स संघाचे सराव शिबिर सुरू होणार आहे.
संजू सॅमसनचे फॉर्म मध्ये येणे गरजेचे
आयपीएल २०२१ स्पर्धेपूर्वी संजू सॅमसनचे दुखापतीतून बाहेर येणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या विजय हजारे चषक २०२१ स्पर्धेत संजू सॅमसनने निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याला ५ सामन्यात अनुक्रमे २४,३,६१,२९ आणि ४ धावा करण्यात यश आले आहे. त्याने या स्पर्धेत एकच अर्धशतक झळकावले आहे. तसेच त्याला याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान भारतीय संघात देखील संधी देण्यात आली होती. परंतु, त्याला साजेशी कामगिरी करत आली नाही. त्यामुळे त्याला भारतीय संघातील स्थान गमवावे लागले आहे. त्याने भारतीय संघासाठी खेळलेल्या ७ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ११.८ च्या सरासरीने अवघा ८३ धावा केल्या आहेत.
मुंबई संघाने या खेळाडूंना केले मुक्त
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर १२ मार्च पासून टी -२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी संघ घोषित करण्यात आला आहे. यातील काही खेळाडू इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहेत.तर काही खेळाडू विजय हजारे चषक स्पर्धा खेळत आहेत. अशातच मुंबई संघाकडून खेळत असलेल्या श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकूर यांना मुंबई संघाने, इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेसाठी मुक्त केले आहे. या तिन्ही खेळाडूंनी विजय हजारे चषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दमदार कामगिरीचे पृथ्वी शॉला मिळाले बक्षीस, ‘या’ मोठ्या स्पर्धेत सांभाळणार मुंबईचे नेतृत्व
“…तर कुंबळेने १००० कसोटी बळी घेतले असते”, ‘या’ दिग्गजाने सांगितले कारण
युनिव्हर्स बॉस म्हणतोय,”मी जगातील सर्वोत्तम फलंदाज”; दिले ‘हे’ कारण




