सोमवारी (दि. 04 सप्टेंबर) आशिया चषक 2023 स्पर्धेचा पाचवा सामना भारत विरुद्ध नेपाळ संघात पार पडला. हा सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम येथे खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 10 विकेट्सने मोठा विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघ सुपर 4 फेरीत पोहोचला. या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 23 षटकात 145 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने 17 चेंडू शिल्लक ठेवत पार केले. यासह पाकिस्तानपाठोपाठ भारतही अ गटातून सुपर-4 फेरीत पोहोचला. मात्र, या विजयानंतरही रोहित नाराज दिसला. यावेळी त्याने दोन मोठ्या कमतरता सांगितल्या.
भारत विरुद्ध नेपाळ (IND vs NEP) सामन्यात भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षकांनी तीन झेल सोडले. हे तिन्ही झेल विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांनी सहजरीत्या सोडले. मात्र, सामन्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अशा गचाळ क्षेत्ररक्षणावर आगपाखड केली.
काय म्हणाला रोहित?
रोहित शर्मा म्हणाला, “सुपर-4मध्ये आणखी चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करू. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 4 विकेट्स पडल्यानंतर ज्याप्रकारे हार्दिक आणि ईशान किशनने फलंदाजी केली, ती शानदार होती. आजच्या सामन्यात आमची गोलंदाजी ठीक-ठाक होती, पण आम्ही आणखी चांगली गोलंदाजी करू शकलो असतो. मात्र, क्षेत्ररक्षण खराब होते. यासोबत आम्ही विश्वचषकच काय, आशिया चषकही खेळू शकत नाही. हे मान्य केले जाऊ शकत नाही. आम्हाला यामध्ये सुधारणा करावी लागेल.”
आपल्या खेळीमुळे खुश नाही रोहित
रोहितला यावेळी त्याच्या खेळीबद्दल खुश असण्याविषयी प्रश्न विचारला गेला. यावर रोहित म्हणाला, “नाही, सुरुवातीला मी थोडा चिंतेत होतो. एकदा सेट झालो, तर मी अखेरपर्यंत फलंदाजी करू इच्छित होतो.” फ्लिक स्वीपबाबत तो म्हणाला, “मी हा शॉट जाणूनबुझून खेळलो नव्हतो. मी चेंडूला शॉर्ट फाईन लेगच्या वरून खेळू इच्छित होतो. मात्र, चेंडू बॅटवर येऊन थोडा दूर गेला.”
‘अजूनही खूप काम करायचे बाकी’
विश्वचषक संघाशी संबंधित प्रश्नावर तो म्हणाला, “ज्यावेळी आम्ही इथे आलो, तेव्हा आम्हाला माहिती होते की, विश्वचषकात आमच्यासाठी 15 खेळाडू कोण असणार आहेत. आशिया चषकातून आम्हाला स्पष्ट होणार नव्हते. कारण, आमच्याकडे साखळी फेरीतील दोनच सामने होते. मात्र, सुदैवाने आम्हाला पहिल्या सामन्यात फलंदाजी आणि नेपाळविरुद्ध गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. अजूनही खूप काम करायचे बाकी आहे. अनेक खेळाडू दुखापतीतून पुनरागमन करत आहेत. त्यांना लयीत परतण्यासाठी वेळ हवा आहे.”
भारताचा 10 विकेट्सने विजय
या सामन्यात नेपाळने प्रथम फलंदाजी करताना 48.2 षटकात 10 विकेट्स गमावत 230 धावा कुटल्या होत्या. यावेळी भारताकडून मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमामुळे हे आव्हान कमी होऊन 23 षटकात 145 धावा असे झाले. हे आव्हान भारताने 17 चेंडू शिल्लक ठेवत पार केले. तसेच, हा सामना 10 विकेट्सने जिंकला. यावेळी भारताकडून रोहितने 59 चेंडूत 74 धावा आणि शुबमनने 62 चेंडूत 67 धावा केल्या होत्या. (captain rohit sharma after 10 wicket win in over nepal said this read here)
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषक संघातून शार्दुल अन् अय्यरची हाकालपट्टी, पाहा माजी दिग्गजाने कोणत्या 15 खेळाडूंची केलीये निवड
कुठे आणि कसा पाहायचा श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामना?, जाणून घ्या लगेच