रविवारी(24 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विशाखापट्टणम येथे पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
हा सामना भारताने पराभूत जरी झाला असला तरी कर्णधार विराट कोहलीने त्याच्या एका कृतीने सर्वांची मने जिंकली आहेत.
या सामन्यात भारतीय संघ हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरला होता. ही काळी पट्टी भारतीय संघाने 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ बांधली होती.
तसेच भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंनी, सपोर्ट स्टाफने सामना सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत झाल्यानंतर दोन मिनीटे शांतता राखत या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
पण दोन मिनीटाच्या शांततेवेळी प्रेक्षकांकडून भारतीय संघाला प्रोत्साहन देताना आवाज होत होता. त्यामुळे विराटने प्रेक्षकांना तोंडावर बोट ठेवत शांत राहण्याचे आवाहन केले होते. त्याची ही कृती प्रेक्षकांच्या त्यावेळी लक्षात आली की नाही माहित नाही, पण त्याने दाखवलेल्या जागरूकतेबद्दल त्याचे कौतुक होत आहे.
जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर हा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले तर अनेक जवान जखमी झाले आहेत.
रविवारी झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला योग्य ठरवत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताचा डाव 20 षटकात 7 बाद 126 धावांवर रोखला.
भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. तसेच एमएस धोनीने नाबाद 29 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून नॅथम कुल्टर नाईलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 127 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 56 धावा केल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या षटकात 14 धावांची गरज होती. यावेळी उमेश यादवच्या गोलंदाजीवर पॅट कमिन्स आणि झाय रिचर्डसनने या 14 धावा करत ऑस्ट्रेलियाला 3 विकेट्सने विजय मिळवून दिला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा टी20 सामना 27 फेब्रुवारीला बंगळूरु येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-आजच्याच दिवशी क्रिकेटच्या डाॅनने घेतला होता अखेरचा श्वास
-मुंबईकर पृथ्वी शाॅची जाळ आणि धुर खेळी, षटकार- चौकारांची बरसात
-सांगलीकर स्मृती मंधानाची धुव्वांदार फलंदाजी, टीम इंडियाला मिळवून दिला एकहाती विजय