भारत आणि इंग्लंड संघादरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर पूर्णपणे दबाव बनवलेला आहे. भारतीय संघासाठी हा सामना अतिशय कठीण ठरत आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावांचा डोंगर उभा केला होता.
त्याच्या प्रत्युतरात भारतीय फलंदाजांनी अतिशय निराशाजनक कामगिरी केली. भारताचे पहिले 4 फलंदाज केवळ 73 धावांवर बाद होते. मात्र यानंतर चेतेश्वर पुजारा व रिषभ पंतने शानदार शतकीय भागीदारी केली. ही भागीदारी भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करुन देणार असे वाटत असतानाच पुजारा नाट्यमय रित्या बाद झाला.
भारताच्या डावातील 51वे षटक टाकण्यासाठी डॉम बेस गोलंदाजीसाठी आला. षटकातील चौथ्या चेंडूवर पुजाराने आक्रमक फटका मारला, मात्र चेंडू शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या ऑली पोपच्या पाठीला लागून रॉरी बर्न्स कडे गेला. बर्न्सने अलगद झेल पकडत पुजराचा डाव समाप्त केला. पुजाराने 143 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 73 धावा केल्या.
दरम्यान सामन्याचा विचार केला असता तिसरा दिवस देखील इंग्लडच्या बाजूने झुकला. दिवसअखेर भारताने आपल्या डावात 6 गडी गमावत 257 धावा केलेल्या आहेत. भारताकडून केवळ रिषभ पंत व चेतेश्वर पुजारा यांनी काहीसा संघर्ष केला. पंतने आक्रमक 91 धावांची खेळी केली. भारतीय संघ इंग्लंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून अजूनही 321 धावांनी पिछाडीवर आहे.
तत्पूर्वी इंग्लंडचा पहिला डाव गाजवला तो कर्णधार जो रुटने. रुटने 377 चेंडूत 19 चौकार व 2 षटकारासह 218 धावांची शानदार खेळी केली.त्याला डॉम सिबली (87) व बेन स्टोक्सने (82) उत्तम साथ दिली. दरम्यान भारतीय संघाची पुढील वाट अतिशय खडतर मानली जात आहे. भारताला पराभव टाळण्यासाठी सामन्याच्या चौथ्या दिवशी अविश्वसनीय कामगिरी करावी लागेल.
महत्वाच्या बातम्या:
दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहला खेळवू नये, माजी खेळाडूची मागणी
दुर्दैवी! वेस्टइंडीजच्या महिला संघाला विश्वविजेता बनवणाऱ्या माजी गोलंदाजाचे कारच्या धडकेने निधन
BAN vs WI : पदार्पणवीर कायले मेयर्सचे अद्भुत द्विशतक, वेस्ट इंडिजचा बांगलादेशवर संस्मरणीय विजय






