बँगलोरमध्ये झालेल्या आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात (IPL 2022 Mega auction) अनेक रोमांचक गोष्टी पाहायला मिळाल्या. दुसऱ्या दिवसाच्या (13 फेब्रुवारी) शेवटच्या काही तासांत हा थरार पाहण्यासारखा होता. खेळाडूंच्या वर्गीकरणासाठी खुप वेळा सर्व फ्रँचायझींकडून निवडक खेळाडूंची यादी मागविण्यात आली होती, जेणेकरून क्रमवारी लावता येईल. यामुळे शेवटच्या फेरीत ते खेळाडूही विकले गेले, ज्यांच्यावर पहिल्या दिवशी कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. पण या यादीत सुरेश रैनाचे(sureah raina) नाव नसल्याने त्याच्या लहाणपणीच्या प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या यादीमध्ये डेव्हिड मिलर, उमेश यादव, मोहम्मद नबी, ऋद्धिमान साहा यांच्यासह अनेक खेळाडूंना खरेदीदार मिळण्यात यश आले. पण संपूर्ण मीडियात चर्चेचा विषय हा आहे की आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या सुरेश रैनाचे म्हणजेच मिस्टर आयपीएलचे नाव या यादीत पुन्हा समाविष्ट का केले गेले नाही. रैनाचे लहानपणीचे प्रशिक्षक एसपी कृष्णन यांनी फेसबुक पोस्टद्वारे रैनाचे नाव बोलीमध्ये समाविष्ट न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. रैनाला त्याचे बालपणीचे प्रशिक्षक एसपी कृष्णन यांच्याबद्दल खूप आदर आहे.
ते म्हणाले की, “या वर्षाच्या आयपीएलमधून सुरेश रैनाला वगळण्यात आल्याचे पाहून मला खूप वाईट वाटत आहे. या मेगा लिलावामधून मिस्टर आयपीएल मिस झाल्यामुळे त्याचे लाखो चाहते निराश झाले आहेत. त्याचा आनंदी चेहरा आणि वागणूक अनेकांसाठी प्रेरणा आहे. मी सीएसकेचे सामने पाहताना त्याला खुप मिस करेन.”
रैनाच्या सोबत घडलेल्या या प्रसंगावर आश्चर्य वाटण्याचे कारण म्हणजे लिलावाच्या काही दिवस आधी तो सीएसके संघाचा कर्णधार बनण्याच्या चर्चा जोरात सुरू होत्या. पण पहिल्या दिवशी त्याच्या नावावर कोणीही बोली लावली नाही, तेव्हा रैनाच्या चाहत्यांना आश्चर्य वाटले. पण सर्वात मोठे आश्चर्य हे होते जेव्हा दुसऱ्या दिवशी पहिली बोली संपल्यावर पाहायला मिळाले. सर्व फ्रँचायझी संघांनी एकत्रितपणे सादर केलेल्या १०६ खेळाडूंच्या यादीत रैनाचे नाव सुद्धा नव्हते. सुरेश रैनाला अशी वागणूक का देण्यात आली? याचे आश्चर्य सर्वांनाच वाटले.
‘मिस्टर आयपीएल’चे नाव दुसऱ्या दिवशी बोलीमध्ये समाविष्ट करण्यात का आले नाही? हा प्रश्न उपस्थित करत त्याच्या प्रशिक्षकांसोबतच चाहत्यांनीही सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. जेव्हा अंबाती रायडू आणि इतर खेळाडू लिलावात विकले जाऊ शकतात, तेव्हा शेवटच्या क्षणी त्याचे नाव पुनर्विक्रीसाठी का ठेवले गेले नाही? असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल स्पर्धेचे सर्व १४ हंगाम खेळणारे हे ४ शिलेदार, १५ व्या हंगामात राहिले अनसोल्ड; पाहा यादी
आठ कोटी खर्च करूनही आर्चर असेल अनुपलब्ध, तरीही मुंबईने का लावला दाव? नीता अंबानी म्हणाल्या…
‘रेकॉर्डतोड’ चौदा कोटींची बोली लागूनही दीपक चहर नाराज; म्हणाला, “ती इच्छा राहिली अपूर्ण”