---Advertisement---

काय चाललंय! ऑस्ट्रेलियात दुसऱ्या सराव सामन्यातही रिषभ पंत फेल, टी20 विश्वचषकातून होणार हाकालपट्टी?

On: गुरूवार, ऑक्टोबर 13, 2022 3:08 PM
Rishabh-Pant
---Advertisement---

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला असून सध्या सराव सामने खेळत आहे. हे सामने खेळून भारतीय खेळाडू तेथील परिस्थितीशी ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, काही खेळाडूंना लय सापडत नसल्याचे दिसत आहे. यामध्ये यष्टीरक्षक रिषभ पंत याचा समावेश आहे. पंतची टी20 विश्वचषकातील वाट खडतर होताना दिसत आहे. गुरुवारी (दि. 13 ऑक्टोबर) वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात पंतला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे आता मोठा पेच निर्माण झाला आहे.

भारत विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (India vs Western Australia) संघात झालेल्या पहिल्या सामन्यात रिषभ पंत (Rishabh Pant) केवळ 9 धावा करू शकला होता. आता दुसऱ्या सामन्यातही त्याला फक्त 9 धावाच करता आल्या. यापूर्वी 6 टी20 सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर पंत कोणत्याही सामन्यात 30 धावांचा आकडा पार करू शकला नव्हता.

पंतची सराव सामन्यातील कामगिरी
रिषभ पंत याने 10 ऑक्टोबर रोजी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या पहिल्या सराव सामन्यात 16 चेंडूत 9 धावा चोपल्या होत्या. गुरुवारी तो फक्त 11 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. यामध्ये त्याने एक षटकारही मारला.

सामन्याचा आढावा
या सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 168 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत फक्त 132 धावाच करू शकला. 6 षटकांच्या पावरप्लेनंतर भारतीय संघाची धावसंख्या 1 विकेट गमावत 29 धावा इतकी होती. मात्र, पुढे भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार केएल राहुल याने एका बाजूने फटकेबाजी सुरू ठेवली. त्याने या सामन्यात सर्वाधिक धावा काढल्या. त्याने 55 चेंडूंचा सामना करताना 74 धावा कुटल्या. यामध्ये 2 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. त्याच्यामुळे भारताला या सामन्यात निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 132 धावा करता आल्या. मात्र, आव्हानापर्यंत पोहोचण्यात भारत अपयशी ठरला. त्यामुळे भारताला या सामन्यात 36 धावांनी पराभूत व्हावे लागले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ठोकल्या 27 धावा
यापूर्वी भारतीय संघाचा 25 वर्षीय युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने इंदोरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना तिसऱ्या टी20 27 धावा केल्या होत्या. या सामन्यात तो सलामीवीर फलंदाज म्हणून उतरला होता. यावेळी त्याने 14 चेंडूंचा सामना केला होता. त्यात त्याने 2 षटकार आणि 3 चौकारही मारले होते. दुसरीकडे, त्याने टी20 आशिया चषकादरम्यान अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 20, श्रीलंकेविरुद्ध 17 आणि पाकिस्तानविरुद्ध 14 धावा केल्या होत्या.

पंतला दिनेश कार्तिक देतोय टक्कर
रिषभ पंतला सातत्याने अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) याच्याकडून टक्कर मिळत आहे. कार्तिक आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. पंतने आतापर्यंत 164 डावांमध्ये 4328 धावा केल्या आहेत. 2 शतके आणि 22 अर्धशतकेही झळकावली आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 145.28 इतका राहिला आहे.

टी20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून सुरू
टी20 विश्वचषकाला येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO | वॉर्नरच्या डोक्याला झाली असती गंभीर दुखापत, सुदैवाने थोडक्यात निभावलं
टी20 विश्वचषकात ‘याच’ टीमची चर्चा! अवघ्या सहा देशांच्या खेळाडूंचा मिळून तयार झाला संघ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---