रविवारी (23 एप्रिल) कोलकाता येथील ईडन गार्डनवर झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात पाहुण्या चेन्नई संघाने 49 धावांनी दणदणीत विजय मिळवला. चेन्नईच्या या विजयाचा शिल्पकार अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे हा ठरला. त्याच्या नाबाद अर्धशतकामुळे चेन्नई 235 पर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरलेला. अजिंक्यला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर बोलताना त्याने आपला सर्वोत्तम खेळ होणे अद्याप बाकी असल्याचे म्हटले.
मागील हंगामातील खराब कामगिरीनंतर केकेआरने अजिंक्यला रिलीज केले होते. चेन्नईने 50 लाखांच्या मूळ किमतीत त्याला आपल्या संघात दाखल करून घेतले. पहिल्या दोन सामन्यात बाकावर बसावे लागल्यानंतर त्याने मुंबईविरुद्ध पहिला सामना खेळला. या सामन्यात त्याने 27 चेंडूंमध्ये 61 धावा केल्या. त्यानंतर 31 व 37 धावा करण्यात त्याला यश आले. हैदराबादविरुद्ध तो केवळ 9 धावा करू शकलेला. त्यानंतर आता केकेआरविरुद्ध त्याने 29 चेंडूवर नाबाद 71 करत आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले. त्याच्या या खेळीत 6 चौकार व 5 षटकारांचा समावेश होता.
सामनावीर ठरल्यानंतर रहाणे म्हणाला,
“माझी अशी कामगिरी केवळ माइंड सेटमुळे होत आहे. तुम्ही कोणाशी बोलता आणि त्यावर कशी कृती करता यावर सगळे अवलंबून असते. माझा खेळ मी सध्या एन्जॉय करतोय. चांगल्या सुरुवातीनंतर आपल्यावरील बंधने कमी होतात. या हंगामात मी आनंद घेतला आहे. मला वाटते माझी सर्वश्रेष्ठ कामगिरी येणे अद्याप बाकी आहे.”
रहाणेने आतापर्यंत हंगामात खेळलेल्या पाचपैकी 4 सामन्यात 30 पेक्षा जास्त धावा केल्या असून, दोन वेळा त्याला अर्धशतकाची वेस ओलांडता आली आहे. विशेष म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट या हंगामात सर्वाधिक दिसून येतो.
(CSK Batter Ajinkya Rahane Said My Best Yet To Come After Inning Against KKR)