टी-२० विश्वचषक स्पर्धेला २ महिन्यांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. यूएईमध्ये आयोजित करण्यात आलेली ही टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा तब्बल ५ वर्षांनी आयोजित करण्यात येत आहे. त्यामुळे या स्पर्धेला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. स्पर्धा जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे अनेक दिग्गज खेळाडू याबाबत आपले तर्कवितर्क मांडत आहेत.
यातच आणखी एका दिग्गज खेळाडूने या स्पर्धेबाबत आपले मत व्यक्त केले आहे. वेस्टइंडीज संघाला २ वेळा टी-२० विश्वचषक स्पर्धेचे किताब जिंकून देणारा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने आता याबाबत वक्तव्य केले आहे. सॅमीने यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा कोण जिंकणार याबाबत भाष्य केले आहे.
सॅमीच्या मते कायरन पोलार्डच्या नेतृत्वात असलेल्या वेस्ट इंडिजचा संघ ही स्पर्धा जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. सॅमीने वेस्टइंडीज संघातील खेळाडूंमुळे हा तर्क दिल्याचे समजते.
याबाबत बोलताना सॅमी म्हणाला, “वेस्ट इंडिजचा संघ यंदाची स्पर्धा जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. कारण, जर तुम्ही वेस्टइंडीज संघाकडे पाहिले, तर समजेल की गेल्या ३ स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या ४ स्थानांमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला होता. तसेच, यामध्ये २ वेळा वेस्टइंडीजचा संघ विजयी देखील झाला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षीही वेस्ट इंडिज संघ मजबूत स्थितीत आहे. आता यामध्ये काही लोकांना वाटू शकते मी वेस्टइंडीजचा असल्याकारणामुळे वेस्ट इंडिजला प्रबळ दावेदार मानत आहे, मात्र तसे नाही.”
आतापर्यंत टी-२० विश्वचषक स्पर्धेचे ६ वेळा आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वेस्ट इंडीज संघाने २ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. २०१२ साली श्रीलंकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या टी-२० स्पर्धेत वेस्टइंडीज संघाने पहिल्यांदा स्पर्धेत विजय मिळवला होता.
त्यानंतर २०१४ साली बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. ज्यानंतर २०१६ मध्ये पुन्हा वेस्ट इंडीज संघाने इंग्लंडच्या संघाला नमवत दुसऱ्यांदा ही विश्वचषक स्पर्धा जिंकली. यामध्ये उपांत्य फेरीत वेस्टइंडीजने भारताला नमवून अंतिम फेरीत धडक मारली होती.
या खेळाडूंमुळे वेस्ट इंडिजचा संघ आहे मजबूत स्थितीत
सॅमीने टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या संघाला जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला आहे. संघातील काही खेळाडूंमुळे सॅमीने हा तर्क दिला आहे. याबाबत बोलताना सॅमी म्हणाला, “वेस्टइंडीज संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड विषयी बोलायचे झाल्यास त्याने संघांमध्ये उत्कृष्टपणे पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर संघामध्ये युनिव्हर्स बॉस क्रिस गेल, आंद्रे रसेल, जेसन होल्डर, फॅबियन ॲलन, एविन लुईस यांसारखे खेळाडू आहेत. ज्यामुळे वेस्टइंडीजचा संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. त्यामुळे विरोधी संघावर वर्चस्व प्राप्त करण्याची ताकद या खेळाडूंमध्ये दिसून येते.”
त्याचबरोबर सॅमीने या टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून विराट कोहलीचे नाव निवडले आहे. त्याच्यामध्ये या स्पर्धेत विराट कोहली सर्वाधिक धावा करू शकतो.
तसेच सॅमीने ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीपासून एका गोष्टीवर जास्त भर दिला आहे. तो म्हणजे या स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार कोण पटकावणार.
याबाबत बोलताना सॅमी म्हणाला, “या स्पर्धेत सर्वाधिक धावा कोणीही बनवू, मात्र माझे लक्ष या स्पर्धेत मालिकावीर पुरस्कार कोणाकडे जाणार याकडे लागून आहे. माझ्या मते, मालिकावीराचा पुरस्कार आंद्रे रसेलला मिळू शकतो. रसेल सारखा खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजीत दोन्ही विभागात आपले योगदान देऊ शकतो. त्यामुळे संघासाठी तो एक महत्वाचा खेळाडू बनू शकतो. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे तो संघाला आणखी एकदा विजय बनवण्यात मोलाचे योगदान देऊ शकतो.”
दरम्यान, ही स्पर्धा आधी भारतात आयोजित करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा यूएई आणि ओमान येथे हलवण्यात आली. नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) सामन्यांचे वेळापत्रक देखील जाहीर केले होते.
या स्पर्धेत सुपर १२ फेरीसाठी २ गट तयार करण्यात आले आहेत. अ गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे, तर उर्वरित २ संघ पात्रता फेरीतून सहभागी होणार आहे. ब गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या ४ संघांचा समावेश आहे, तर २ संघ पात्रता फेरीतून सहभागी होणार आहे. भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–‘फिटनेस किंग’ विराट कोहली पितो ब्लॅक वॉटर, एका लीटरची किंमत उडवेल तुमची झोप
–“जर मी रूटच्या जागी असतो, तर मी बेन स्टोक्सला पुन्हा बोलवले असते”, दिग्गज भारतीय क्रिकेटरचा सल्ला
–मस्तीखोर पंतने स्वत:ला म्हटले वर्गातील सर्वात ‘सभ्य मुलगा’, अक्षर-ईशांतने दिल्या भन्नाट प्रतिक्रिया