आयपीएलमधील 14 व्या मोसमात गुरुवारी (15 एप्रिल) रोजी खेळलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा तीन गडी राखून पराभव केला. या पराभवाबद्दल दिल्ली कॅपिटल्सचे मुख्या प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज आर अश्विनला गोलंदाजी न देणे ही दिल्ली कॅपिटल्सची सर्वात मोठी चूक असल्याचे सांगितले आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली संघाकडून खेळणाऱ्या अश्विनने 7, 9 आणि 11 व्या षटकांत गोलंदाजी केली. या तीन षटकांत त्याने केवळ 14 धावा दिल्या आणि त्यामध्ये त्याने एकही चौकार किंवा षटकार खाल्ला नाही. पण अश्विनच्या कोठ्यातले चौथे षटक त्याला देण्याऐवजी रिषभ पंतने ते षटक मार्कस स्टॉयनिसला दिले आणि त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. स्टॉयनिसच्या या षटकात राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी 15 धावा करुन सामन्यात पुनरागमन केले.
पाँटिंगने अश्विनच्या गोलंदाजीचे जोरदार कौतुक करत म्हटले की, “अश्विनने त्याच्या षटकांत चांगली गोलंदाजी केली. त्याने त्याच्या तीन षटकांत अवघ्या 14 धावा दिल्या. त्यामध्ये राजस्थानच्या फलंदाजांना अश्विनच्या गोलंदाजीवर एकही चौकार किंवा षटकार ठोकता आला नाही. परंतु त्याला त्याचे चौथे षटक न देण्यात आमच्याकडून चूक झाली आणि आम्ही जेव्हा एकत्र जमू तेव्हा याबद्दल नक्की चर्चा करू”
पुढे ते म्हणाले, “अश्विन खूप मेहनत घेत असून प्रत्येक सामन्यानंतर तो स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. संघाच्या योजनेत सहभागी होण्याचा प्रयत्न करतो. त्याची राजस्थानविरुद्धची गोलंदाजी उत्कृष्ट होती परंतु आमच्याकडून चूक झाली.”
दिल्लीविरुद्ध 148 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने 42 धावांत आपले पाच गडी गमावले होते. पण अंतिम 5 षटकांत राजस्थान रॉयल्सने षटकार ठोकून तीन गडी आणि दोन चेंडू राखून दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील पहिला विजय मिळविला.
महत्त्वाच्या बातम्या-
“निवृत्तीनंतरही एबी डिविलियर्स पुन्हा खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट, पण…” प्रशिक्षकाने दिले संकेत
रोहितची थट्टा करणे अँकर मयंतीला पडले महागात, चाहत्यांनी घेतली शाळा; वाचा पूर्ण प्रकरण