---Advertisement---

ENG vs IND, 1st Test, 2nd Day: पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला; दिवसाखेर भारताच्या ४ बाद १२५ धावा

On: गुरूवार, ऑगस्ट 5, 2021 10:35 PM
---Advertisement---

नॉटिंघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात बुधवारपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. ट्रेंट ब्रिज मैदानावर होत असलेल्या या सामन्याचा गुरुवारी दुसरा दिवस होता. मात्र या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ ३३.४ षटकांचा खेळ होऊ शकला.

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताचे वर्चस्व राहिले होते. भारताच्या सलामीवीरांनी पहिले सत्र खेळून काढत चांगली सुरुवात केली. मात्र, पहिल्या सत्राच्या अखेरीस रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात भारताला मोठे धक्के बसले आहे. दुसऱ्या सत्राची सुरुवात झाल्यानंतर इंग्लंडचे गोलंदाज आक्रमक भासत होता. त्याच्या गोलंदाजीवर ४० व्या षटकात चेतेश्वर पुजारा डीआरएस रिव्ह्यूमुळे वाचला.

पण, त्याला या जीवदानाचा फार फायदा घेता आला नाही. कारण ४१ व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर जेम्स अँडरसनने पुजाराला यष्टीरक्षक जॉस बटलरकडे झेल देण्यास भाग पाडले. यावेळीही रिव्ह्यू घेण्यात आला. मात्र, यावेळी रिव्ह्यू पुजाराच्या विरुद्ध गेला. त्यामुळे केवळ ४ धावा करुन पुजारा माघारी परतला. एवढेच नाही तर त्या पुढच्याच चेंडूवर अँडरसनने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार विराट कोहलीला अँडरसनने शुन्यावर माघारी धाडले. पहिलाच चेंडू खेळणाऱ्या विराटचाही झेल बटलरने घेतला.

त्यानंतरही भारताचा डाव सारवण्यात अजिंक्य रहाणेला अपयश आले. तो ५ धावांवर ४४ व्या षटकात धावबाद झाला. त्याला जॉनी बेअरस्टोने धावबाद केले. त्यामुळे रिषभ पंतला मैदानावर यावे लागले. मात्र, काहीवेळातच पावसाला सुरुवात झाली. सातत्याने पाऊस येत असल्याने डावाच्या ४६.४ षटकांनतरचा खेळच होऊ शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळही थांबवण्यात आला. दुसऱ्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात ४६.४ षटकात ४ बाद १२५ धावा केल्या. भारताकडून केएल राहुलने अर्धशतक पूर्ण केले असून तो ५७ धावांवर नाबाद आहे. तर पंत ७ धावांवर नाबाद आहे.

रोहित-केएल राहुलची दमदार सुरुवात 

दुसऱ्या दिवसाशी भारताने पहिल्या डावातील बिनबाद २१ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. भारताकडून पहिल्या दिवसाखेर नाबाद असलेली रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामीवीरांची जोडी दुसऱ्या दिवशी मैदानात उतरली. या जोडीने पहिल्या सत्रात संयमी खेळ करताना अनेकदा काही आक्रमक फटकेही मारले. त्या दोघांनी संपूर्ण पहिल्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नव्हते.

रोहित आणि राहुलची जोडी जमली असताना त्यांच्यात शतकी भागीदारी होईल असे वाटले होते. मात्र, त्यांच्यात ९७ धावांची भागीदारी झाली असताना डावाच्या ३८ व्या षटकात रोहित शर्माने ऑली रॉबिन्सनविरुद्ध खेळताना विकेट गमावली. रोहितने पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याच्या फटका चूकला आणि चेंडू बॅटच्या पुढच्या भागाला लागून लांब उडाला. त्यावेळी बाउंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या सॅम करनने चूक न करता त्याचा झेल घेतला. त्यामुळे रोहितला ३६ धावांवर माघारी परतावे लागले.

रोहित बाद होताच पहिल्या सत्राचा खेळ देखील थांबवण्यात आला. पहिले सत्र संपले तेव्हा भारताच्या ३७.३ षटकात १ बाद ९७ धावा झाल्या.

या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात सर्वबाद १८३ धावा झाल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---