---Advertisement---

अख्ख्या टीम इंडियाला पुरून उरले इंग्लंडचे दोन पठ्ठे! इतिहासात चौथ्यांदा रचली गेली ‘अशी’ भागीदारी

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 11:57 PM
---Advertisement---

यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांमध्ये संपविला. त्यानंतर, इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहत यजमानांना ४२ धावांची आघाडी मिळवून दिली. याचसोबत या युवा सलामी जोडीने भारताविरुद्ध एक खास कामगिरी करून दाखवली.

भारतीय फलंदाजांची कचखाऊ फलंदाजी
भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, अनुभवी जेम्स अँडरसनने २१ धावात भारताचे पहिले तीन फलंदाज बाद केले. रहाणे व रोहित यांनी चौथ्या गड्यासाठी सर्वधिक ३४ धावा जोडल्या. चहापानानंतर तर भारताचे अखेरचे ६ फलंदाज केवळ २२ धावांत माघारी परतले. इंग्लंडसाठी अँडरसन व क्रेग ओव्हरटन यांनी प्रत्येकी तीन तर, सॅम करन आणि ओली रॉबिन्सन प्रत्येकी दोन बळी मिळवले.

इंग्लंडच्या सलमीवीरांची शतकी भागीदारी
भारताचा डाव केवळ ७८ धावांवर संपविल्‍यानंतर इंग्लंडचे युवा सलामीवीर रॉरी बर्न्स व हसिब हमीद यांनी भारतीय गोलंदाजांना अजिबात संधी दिली नाही. दोघांनीही वैयक्तिक अर्धशतके पूर्ण करत दिवसाखेर इंग्लंडला बिनबाद १२० धावांपर्यंत मजल मारून दिली. सध्या इंग्लंडकडे ४२ धावांची महत्वपूर्ण आघाडी आहे.

अशी कामगिरी करणारी चौथी जोडी
हमीद व बर्न्स जोडीने भारतीय संघाच्या संपूर्ण धावसंख्येचा अधिक धावा बनवल्याने ते भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारी चौथी सलामी जोडी बनली. भारताविरुद्ध अशी कामगिरी सर्वप्रथम बिल लॉरी व बॉब सिम्पसन यांनी १९६७-१९६८ मध्ये मेलबर्न कसोटीत केली होती. भारतीय संघ १७३ धावांमध्ये सर्वबाद झाल्यानंतर या जोडीने १९१ धावांची सलामी दिलेली.

त्यानंतर दुसऱ्यांदा भारतीय संघाविरुद्ध अशी सलामी दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ व नील मॅकेंझी यांनी केली. २००७-२००८ मध्ये अहमदाबाद कसोटीत भारतीय संघ ७६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर या जोडीने ७८ धावांची सलामी दिली होती. यानंतर २०११ मध्ये अखेरच्या वेळी भारतीय संघावर असा प्रसंग ओढवलेला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीत भारत १६१ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर व एड कवान यांनी पहिल्या गड्यासाठी २१४ धावा जोडलेल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

ENGvsIND, 3rd Test: गोलंदाजांची कमाल अन् सलामीवीरांची अर्धशतकं, पहिल्या दिवसावर इंग्लंडचे वर्चस्व; दिवसाखेर बिनबाद १२० धावा

नको तेच झालं! इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघाचा डाव कोसळला अन् ‘तो’ नकोसा विक्रम झाला

आता मैदानाबाहेर वाकयुद्ध, एका विधानावरुन गावसकर अन् नासिरमध्ये जुंपली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---