भारतीय संघ गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटच्या तीन्ही स्वरुपामध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना दिसून येत आहे. संघातील गोलंदाज आणि फलंदाज आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडत आहेत. या संघात गेल्या काही वर्षात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची एन्ट्री झाली आहे, ज्याने भारतीय संघाला अनेकदा संकटातून बाहेर काढत विजय मिळवून दिला आहे. तसेच चाहत्यांना त्याच्याकडून आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातदेखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. अशातच इंग्लंड संघाच्या यष्टीरक्षक जोस बटलरने रिषभ पंत बद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
रिषभ पंतने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तुफान फटकेबाजी करत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. तसेच गाबामध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात रिषभ पंतने नाबाद ८९ धावांची खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी आणि वनडे मालिकेत देखील त्याने उल्लेखनीय कामगिरी करत १ शतक आणि २ अर्धशतक झळकावले होते.
रिषभ पंत एकटा विरोधकांच्या हातून सामना खेचून घेऊ शकतो
रिषभ पंतने गेल्या काही वर्षात आपल्या फलंदाजीमध्ये खूप सुधारणा केली आहे. तसेच त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे अनेकांना त्याची फलंदाजीची भुरळ पडली आहे. इंग्लंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर म्हणाला, “रिषभ पंत हा असा एक खेळाडू आहे, ज्याच्याविरुद्ध मला खेळायला आवडत नाही. तो कोणत्याही क्षणी सामना तुमच्याकडून खेचू शकतो.”
इंग्लंड दौऱ्यावर असणार आमने सामने
येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. हा सामना झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत जोस बटलर आणि रिषभ पंत हे दोघेही आमने सामने असतील. रिषभ पंत भारतीय संघातील एक मुख्य खेळाडू म्हणून बाहेर आला आहे. त्यामुळे त्याच्याकडून सर्वांनाच चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचा श्रीलंका दौरा रद्द होण्याच्या मार्गावर, ‘या’ मोठ्या कारणामुळे आयोजन धोक्यात?
पक्काच समझा! कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामना ‘हा’ संघच जिंकणार; पाहा कसं ते?