भारतीय संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवण्यात अपयश आले. त्यामुळे भारतीय संघावर टीकाही झाली. पण असे असले तरी भारतीय संघाने गेल्या काही वर्षात कसोटीत केलेल्या उत्तम कामगिरीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. भारताला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचवण्यात संघातील वरिष्ठ खेळाडूंसह युवा खेळाडूंनीही तितकेच मोलाचे योगदान दिले होते. यामध्ये यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतपासून ते वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा समावेश आहे. त्यामुळे अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी या युवा खेळाडूंची स्तुती केली आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने काही युवा खेळाडूंची निवड केली आहे, ज्या खेळाडूंनी त्याला प्रभावित केले आहे.
भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना याने वर्तमान संघातील काही खेळाडूंची निवड केली आहे, ज्यांनी त्याला प्रभावित केले आहे. परंतु, मुख्य बाब म्हणजे त्याने या यादीत रिषभ पंतला स्थान दिले नाही. न्यूज २४ सोबत बोलताना सुरेश रैनाने म्हटले की, “मला वाटते की, कर्नाटकचा देवदत्त पडिक्कल आणि महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड, ज्यांनी मला प्रभावित केले आहे. दोघेही चांगले खेळाडू आहेत. तसेच अक्षर पटेलने देखील खूप मेहनत घेतली आहे. रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत त्याने आपली छाप सोडली आहे.”
परंतु, आश्चर्यकारक बाब म्हणजे सुरेश रैनाने रिषभ पंतचे नाव घेतले नाही. रिषभ पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. पंत बद्दल बोलताना तो म्हणाला, “हे पाहा, त्याने आता वरिष्ठ वर्गात प्रवेश केला आहे. तो आता मोठा झाला आहे. आता तो फक्त षटकार नाही तर चौकार देखील मारतो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मोहम्मद सिराज देखील इतकी चांगली गोलंदाजी करत आहे. मला असे वाटते की,याचे श्रेय राहुल द्रविडला जाते. ज्यांनी भारतीय १९ वर्षाखालील संघासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. हेच मुख्य कारण आहे की, तो आता वरिष्ठ संघात आहे. शिखर धवनला माझ्याकडून श्रीलंका दौऱ्यासाठी खूप शुभेच्छा, मला आशा आहे की,तो चांगली कामगिरी करेल आणि कसोटी संघात पुनरागमन करेल. कारण शिखर धवन एक चांगला खेळाडू आहे, तो देखील चांगली कामगिरी करून पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.”
शिखर गेल्या काही वर्षापासून भारतीय कसोटी संघातून बाहेर आहे. असे असले तरी मर्यादीत षटकांच्या संघात मात्र, शिखर नियमित सदस्य आहे.
रैना पुढे उत्तरप्रदेश संघाबद्दल म्हणाला की, “निश्चितच उत्तरप्रदेश संघातील खेळाडू प्रियम गर्ग, कर्ण शर्मा यांनी खरच खूप चांगली कामगिरी केली आहे. पंजाबचा अभिषेक शर्मा आहे, ज्याने मला खूप प्रभावित केले आहे. तसेच सचिन बेबी देखील आहे, ज्याने खूप मेहनत केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तू गोलंदाजी करतोय की भिक मागतोय?’, त्यावेळी सेहवागने फलंदाजी करतानाच शोएब अख्तरला केले होते गपगार
क्या बात!! भारतीय वंशाच्या अमेरिकन टेनिसपटू समीर बॅनर्जीने पटकावले विम्बल्डन ज्युनियरचे जेतेपद