आजपासून (१८ जुलै) भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघामध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तरीदेखील भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. तर दुसरीकडे श्रीलंका संघाला गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या तीनही स्वरुपामध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. परंतु श्रीलंका संघाला हलक्यात घेणे भारतीय संघाला भारी पडू शकते. कारण श्रीलंका संघ यंदा आपल्या मायदेशात मालिका खेळत आहे. तसेच या संघात असे ४ खेळाडू उपलब्ध आहेत, जे भारतीय संघाला आपल्या कामगिरीने आश्चर्यचकित करू शकतात. कोण आहेत ते ४ खेळाडू? चला जाणून घेऊया.
१) धनंजय डी सिल्वा : श्रीलंका संघाचा उपकर्णधार धनंजय डी सिल्वा भारतीय संघासाठी चिंतेचे कारण ठरू शकतो. चौथ्या क्रमांकावर येणारा हा फलंदाज आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. नुकतेच इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याने ९१ धावांची खेळी करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. त्याची वनडे क्रिकेटमधील सरासरी खूप कमी आहे. त्याने ३० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. परंतु गेल्या ६ सामन्यांमध्ये त्याने ४४ च्या सरासरीने २२० धावा केल्या आहेत. (Four srilankan players who are big threat for team india)
२) वानेंदु हसारंगा : वानेंदु हसारंगा हा श्रीलंका संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडतो. तसे तर तो ऑफ स्पिनर आहे, परंतु आवश्यकता असल्यास फलंदाजीला येऊन तो विरोधी संघातील गोलंदाजांचा घाम काढू शकतो. वानेंदु हसारंगाने २४ वनडे सामन्यात २८.७७ च्या सरासरीने ५१८ धावा केल्या आहेत. तर गेल्या १९ सामन्यांमध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने ३८.२२ च्या सरासरीने ३२२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १०० च्या जवळपास होता. तसेच गोलंदाजी करताना त्याने २४ सामन्यात २२ गडी बाद केले आहेत.
३) दुष्मंता चमीरा : ६ फूट उंचीचा दुष्मंता चमीरा हा श्रीलंका संघासाठी सामना जिंकून देणारा गोलंदाज आहे. जवळपास १५० च्या गतीने गोलंदाजी करणाऱ्या दुष्मंता चमीराने आतापर्यंत एकूण ३१ सामने वनडे खेळले आहेत. यात त्याला ३३ गडी बाद करण्यात यश आले आहे. चमीरा आपल्या गोलंदाजीत मिश्रण करत असतो. अंतिम षटकांमध्ये गोलंदाजी करताना तो नेहमी स्लोवर चेंडूचा वापर करत असतो. त्याने गेल्या ८ वनडे सामन्यामध्ये १४ गडी बाद केले आहेत.
४) अखिला धनंजय : श्रीलंका संघाचा फिरकीपटू अखिला धनंजय देखील श्रीलंका संघासाठी सामना जिंकून देणारा गोलंदाज आहे. तो ऑफ आणि लेग स्पिन करण्यात मास्टर आहे. त्याच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण ३६ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याला ५१ गडी बाद करण्यात यश आले आहे. तसेच २०१७ मध्ये भारतीय संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ५४ धावा देत ६ गडी बाद केले होते. तरीदेखील श्रीलंका संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
बाप बाप असतो! मुलीपासून वेगळा राहत असला तरीही शमीच्या बड्डेदिनी लाडक्या लेकीला ‘खास’ शुभेच्छा
श्रीलंकेच्या नवनियुक्त कर्णधाराने फुंकले रणसिंग; म्हणाला, ‘युवा खेळाडूंमुळे आम्हाला असा होणार फायदा’
कर्णधार धवन म्हणाला, कोहली अन् शास्त्रींच्या ‘खास खेळाडू’ला श्रीलंकेत खेळवणार; पण कोण आहे तो?