सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक डाव आणि 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारताची फलंदाजी खराब राहिली आणि संघ दुसऱ्या डावात केवळ 131 धावांत सर्वबाद झाला. भारतीय संघाच्या दारुण पराभवानंतर माजी भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघात स्थान न मिळालेल्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे याची आठवण झाली.
दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका विजयाच्या शोधात भारतीय संघाकडून खूप अपेक्षा होत्या आणि यावेळी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या अनुभवी खेळाडूंना संघातून बाहेर करण्यात आले. हे दोन्ही खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळले होते.
मात्र, पहिल्या कसोटीतील पराभवामुळे भारताची निराशा झाली असून मालिका जिंकण्याची शक्यता खूप कमी राहिली आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता 3 जानेवारीपासून होणारा सामना भारताने जिंकला तर मालिका बरोबरीत राहील.
हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना कसोटी संघातून वगळण्यावर प्रश्न उपस्थित केले आणि भारताकडे पुजारापेक्षा चांगला कसोटी फलंदाज नाही, असेही सांगितले. तो म्हणाला, “अजिंक्य रहाणेची निवड झाली नाही आणि चेतेश्वर पुजाराला कोणतेही कारण नसताना वगळण्यात आले. हे दोन खेळाडू आहेत ज्यांनी सर्वत्र धावा केल्या आहेत. मागील विक्रमावर नजर टाकली तर पुजाराने विराट कोहली (Virat Kohli) इतकेच योगदान दिले आहे. पुजाराला का सोडले हे मला समजत नाही, कसोटी क्रिकेटमध्ये पुजारापेक्षा चांगला फलंदाज अजून आमच्याकडे नाही. तो हळू खेळतो पण तो तुम्हाला विजय मिळवून देतो. त्याच्यामुळेच भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये कसोटी जिंकल्या.” (After India’s defeat Harbhajan Singh’s big statement about Pujara Said his only contribution is Virat)
हेही वाचा
IND vs SA: भारतीय दिग्गजाकडून दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडाचे कौतुक; म्हणाला, ‘तो रोहितला मागील पाॅकेटमध्ये…’
चेन्नई क्विक गन्स कडून राजस्थान वॉरियर्सचा पराभव, रामजी कश्यपला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार