श्रीलंका दौऱ्यावरील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मंगळवारी (28 जुलै) रोजी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) टीम इंडियाची घोषणा केली. संघात 33 वर्षीय अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला) स्पिन अष्टपैलू खेळाडू सारांश जैनचे (Saransh Jain) नाव पाहून अनेक चाहते थक्क झाले. अनेकांनी तर याआधी सारांशचे नावही ऐकले नव्हते. त्याला या उंचीपर्यंत पोहोचवण्यात टीम इंडियाचे माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांचा खूप मोठा वाटा आहे.
हरभजन यांनी म्हटलेलं एक वाक्य सारांशच्या मनावर कोरलं गेलं. टीम इंडियात निवड झाल्यानंतर हरभजन यांनीही त्याविषयी प्रतिक्रिया देत त्याचे अभिनंदन केलं आहे.
या वर्षी मार्चमध्ये सारांशने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये तो हरभजन सिंग यांच्यासोबत दिसत होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते, “उत्कृष्ट सत्रासाठी हरभजन सिंग यांचे आभार. खरोखरच खूप काही शिकायला मिळाले आणि भविष्यात अशाच आणखी गोष्टींची प्रतीक्षा आहे.
यापुढे सारांशने लिहिले होते, काही मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागत नाही, तर काहीतरी करून दाखवावं लागतं. हे फक्त शब्द नव्हते, तर त्यात मोठी खोली होती आणि ते माझ्यासोबत नेहमी राहतील.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत हरभजन सिंग (Harbhajan Singh on Saransh Jain) यांनी सारांश जैनबद्दल सांगितले की, तो खूप नम्र मुलगा आहे, ज्याला आपली जबाबदारी चांगली माहीत आहे. या विशेष क्षणी मी त्याचे, त्याच्या कुटुंबाचे आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो.
श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी मालिकेत निवड होण्यापूर्वी, सारांशची श्रीलंका-अ विरुद्धच्या दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेसाठी इंडिया-अ संघात निवड करण्यात आली होती, जिथे त्याने जबरदस्त कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना सारांशने एका डावात 70 धावा केल्या आणि दोन्ही डाव मिळून एकूण 6 विकेट्स घेतल्या.






