न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यात हार्दिक पांड्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचला. तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हार्दिकने अवघ्या 17 चेंडूंमध्ये 42 धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने एक चौकार आणि चार गगनचुंबी षटकार ठोकले. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 247.06 इतका राहिला. हार्दिकचा हा फिनिशर अंदाज पुन्हा एकदा भारतीय संघासाठी निर्णायक ठरला.
या खेळीसह हार्दिक पांड्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठला. डेथ ओव्हर्समध्ये (16 ते 20 षटके) 1000 धावा पूर्ण करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. हार्दिकने डेथ ओव्हर्समध्ये 186.93 च्या स्ट्राईक रेटने 1030 धावा केल्या असून या यादीत तो अव्वल स्थानावर आहे. त्याच्या पाठोपाठ डेव्हिड मिलर, मोहम्मद नबी, एमएस धोनी आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय धावा (स्ट्राईक रेट)
1030 – हार्दिक पांड्या (186.93)*
986 – डेव्हिड मिलर (179.92)
973 – मोहम्मद नबी (190.41)
856 – एमएस धोनी (160.60)
838 – नजीबुल्लाह जादरान (199.04)
822 – दासुन शनाका (165.72)
777 – विराट कोहली (198.21)
748 – महमुदुल्लाह (152.65)
सामन्याचा विचार करता, 14.3 षटकांनंतर भारताची अवस्था 3 गडी बाद 185 धावा अशी होती. त्या वेळी भारत 250 धावांपर्यंत मजल मारेल, अशी अपेक्षा होती. मात्र हार्दिक पांड्याने मैदानात उतरताच न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवला आणि पाहता पाहता भारताचा धावसंख्या 20 षटकांत 271/5 अशी भलीमोठी झाली. हार्दिकच्या या खेळीमुळे भारताने टी20 इतिहासात पुन्हा एकदा 250+ धावांचा टप्पा ओलांडला.
या सामन्यात ईशान किशननेही चमकदार कामगिरी करत 43 चेंडूंमध्ये 103 धावांची शतकी खेळी केली. ही त्याची टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिली सेंच्यूरी होती. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही 30 चेंडूंमध्ये 63 धावा करत आक्रमक अर्धशतक झळकावले. ईशान आणि सूर्यकुमार यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 137 धावांची मोठी भागीदारी झाली.
272 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची फलंदाजीही आक्रमक होती, मात्र वाढत्या धावगतीच्या दबावामुळे त्यांचा डाव 19.4 षटकांत 225 धावांवर आटोपला. भारताकडून अर्शदीप सिंगने पाच विकेट्स घेत निर्णायक भूमिका बजावली. अखेर भारताने हा सामना 46 धावांनी जिंकत पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी आपल्या नावावर केली. टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी ही कामगिरी टीम इंडियासाठी आत्मविश्वास वाढवणारी ठरली आहे.






