ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या महिला टी२० विश्वचषकात भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची भारतीय महिला संघाची ही पहिलीच वेळ आहे.
या विश्वचषकात आज(५ मार्च) भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पहिला उपांत्य सामना रंगणार होता. मात्र या सामन्याआधीपासून सिडनीमध्ये पाऊस सुरु होता. त्यामुळे हा सामना नाणेफेकही न होता रद्द झाला आहे.
त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार साखळी फेरीनंतर अ गटात अव्वल क्रमांकावर असणाऱ्या भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. मात्र यामुळे इंग्लंडचे महिला टी२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.
पावसामुळे उपांत्य सामना रद्द झाल्याने भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि इंग्लंडची कर्णधार हिदर नाईट या दोघींनीही भविष्यात अशा परिस्थितीत राखीव दिवस हवा, असे म्हटले आहे.
सामना रद्द झाल्यानंतर कौर म्हणाली, ‘वातावरणामुळे सामना होऊ शकला नाही हे दुर्दैवी आहे. पण हा नियम आहे. भविष्यामध्ये अशा परिस्थितीत राखीव दिवस असणे चांगले असेल. आम्हाला पहिल्या दिवसापासून माहित होते की सर्व सामने जिंकणे महत्त्वाचे होते, नाहीतर उपांत्य सामन्यात कोणताही अडथळा आला तर पुढील गोष्टी आमच्यासाठी कठिण झाल्या असत्या.’
‘अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचे श्रेय संघाचे आहे. आम्हाला सर्व सामने जिंकायचे होते आणि आम्ही ते केले. सर्वजण चांगल्या लयीत आहेत. शेफाली (वर्मा) आणि स्म्रीती (मंधना) आम्हाला चांगली सुरुवात देत आहेत. आशा आहे की त्या अंतिम सामन्यातही चांगली सुरुवात देतील. सुरुवात चांगली मिळणे गरजेचे असते कारण टी२० लहान स्वरुपाचा क्रिकेट प्रकार आहे आणि कठिण परिस्थितीत यामध्ये पुनरागमन करणे अवघड असते.’
भारताने साखळी फेरीतील सर्व ४ सामने जिंकून अ गटाच्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर मिळवला होता.
कौर पुढे म्हणाली, ‘आमचा सराव चांगला सुरु आहे. आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करु. दुर्दैवाने सध्या मी आणि मंधना अपेक्षेप्रमाणे खेळ करु शकलेलो नाही. पण आमचे अन्य खेळाडू पुढे येऊन जबाबदारी घेत आहेत, हे पाहून चांगले वाटले. हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे कारण आमचा पहिलाच अंतिम सामना आहे.’
‘आम्हाला आता मैदानावर जाऊन चांगला खेळ करायचा आहे. मला वाटते जर आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ केला तर विश्वचषक जिंकण्याची आमच्याकडे चांगली संधी आहे. आम्ही अंतिम सामन्यात कोणाविरुद्ध खेळणार आहोत याचा सध्या विचार करत नाही.’
महिला टी२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्याच होणार आहे. यांच्यातील विजेता संघ अंतिम सामन्यात भारताविरुद्ध खेळेल. तसेच या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. त्यामुळे जर हा सामना देखील रद्द झाला तर ब गटात साखळी फेरीनंतर अव्वल क्रमांक मिळवणारा दक्षिण आफ्रिका संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–फायनलमध्ये प्रवेश केलेल्या टीम इंडियाची ७ टी२० विश्वचषकातील अशी आहे कामगिरी
–इतिहास घडला! टीम इंडिया पहिल्यांदाच टी२० विश्वचषकाच्या फायनल
–मोठ मोठे क्रिकेटपटूही विचारात पडले पण कारनामा तर पोलार्डने केला